मनपा चालविणार औरंगाबाद दर्शन बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2016 01:08 IST2016-03-19T01:04:12+5:302016-03-19T01:08:58+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्याही भरपूर आहे. पर्यटन क्षेत्रातही काम करण्यासाठी

मनपा चालविणार औरंगाबाद दर्शन बस
औरंगाबाद : औरंगाबाद शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्याही भरपूर आहे. पर्यटन क्षेत्रातही काम करण्यासाठी मनपा व इतर शासकीय विभागांना खूप वाव आहे. भविष्यात आम्ही सर्व मिळून विविध उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. पुण्याच्या धर्तीवर औरंगाबाद दर्शन बस सुरू करण्याचाही विचार सुरू असल्याचे मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सांगितले.
शहरात पूर्वी ५२ दरवाजे होते. त्यातील मोजकेच दरवाजे आता शिल्लक राहिले आहेत. त्यांना परत गतवैभव कसे प्राप्त करून देता येईल, यावर भर देण्यात येईल. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात आम्ही यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूदही केली आहे. दरवाजांसमोर सौंदर्यीकरणाचे काम करण्यात येणार आहे. मकबऱ्याकडे जाणारा रस्ता पर्यटकांना आकर्र्षित करणारा असायला हवा. शहरातील विविध कंपन्यांशी चर्चा करून सीएसआर उपक्रमात या रस्त्याचे सौंदर्यीकरण करण्याचा विचार आहे. शहरातील पर्यटनस्थळांवर दिवसभर फिरता यावे यादृष्टीने एक बस सुरू करण्याचाही मानस आहे. मोठ्या कंपन्यांकडून बस सीएसआर उपक्रमात मिळू शकते का, याची चाचपणी सुरू आहे. आमदार, खासदार निधीतूनही बस मिळविण्यासाठी मनपा प्रयत्न करणार असल्याचे मनपा आयुक्तांनी नमूद केले.
२४ कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांमध्ये तीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचे उत्तर अजून प्रशासनाला प्राप्त झाले नाही. उत्तर आल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे. समांतर जलवाहिनीला करारानुसार १७ कोटी रुपये द्यायचे आहेत. मनपाच्या लेखा परीक्षण विभागाने काही आर्थिक अनियमितता काढली आहे. यासंदर्भात कंपनीने उत्तर प्राप्त झाल्यावर निधी वितरित करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.