मुंबई ते अजिंठा हेलिकॉप्टर सेवा!
By Admin | Updated: October 30, 2014 00:31 IST2014-10-30T00:20:23+5:302014-10-30T00:31:03+5:30
औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या पाहण्यासाठी विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. विमानाने येणाऱ्या पर्यटकांना औरंगाबादहून वाहनाद्वारे ये-जा करावी लागते.

मुंबई ते अजिंठा हेलिकॉप्टर सेवा!
औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या पाहण्यासाठी विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. विमानाने येणाऱ्या पर्यटकांना औरंगाबादहून वाहनाद्वारे ये-जा करावी लागते. वेळ आणि पैसा जास्त जात असल्याने एमटीडीसीने मुंबई ते अजिंठा हवाईसेवा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दोन खाजगी कंपन्यांसोबत प्रशासनाचे चर्चाही सुरू केली आहे.
दरमहा दीड हजारहून अधिक विदेशी पर्यटक अजिंठा लेण्या पाहण्यासाठी येतात. बहुतांश पर्यटक मुंबईहून विमानाद्वारे किंवा रेल्वेने औरंगाबादेत दाखल होतात. औरंगाबादहून १०९ कि.मी. वाहनाने प्रवास करून त्यांना अजिंठा येथे पोहोचावे लागते. काही विदेशी पर्यटकांना ही प्रक्रिया खूपच कठीण आणि क्लिष्ट वाटते. मुंबईहून थेट अजिंठा लेण्यापर्यंत किमान हेलिकॉप्टर सेवा असावी, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे.
यापूर्वी जिल्हा प्रशासनाने औरंगाबाद ते शिर्डी आणि अजिंठा हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यासंदर्भात विचारविमर्श केला होता. मात्र, ही योजना प्रत्यक्षात अमलात आली नव्हती. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या मुंबई कार्यालयाने यासंदर्भात पुन्हा एकदा पुढाकार घेतला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
अजिंठा येथे एमटीडीसीच्या जागेवर हेलिपॅड बांधण्यात आलेला आहे. मागील अनेक वर्षांपासून या हेलिपॅडचा वापरच होत नाही. मुंबईहून हेलिकॉप्टर सेवा सुरू केल्यास पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा एमटीडीसी प्रशासनाला आहे. या सेवेतून एमटीडीसीला काही उत्पन्न मिळेल. कारण हेलिपॅड एमटीडीसीच्या जागेवर आहे.
विमानाने मुंबईहून औरंगाबादला येण्यासाठी किमान पाच हजार रुपये आणि औरंगाबाहून टॅक्सीद्वारे अजिंठा येथे जाण्यासाठी किमान दोन हजार रुपये खर्च येतो. मुंबईहून रेल्वेने पर्यटक आले तरी किमान ७०० ते ८०० रुपये लागतात.
खर्चाचा सर्व हिशेब गृहीत धरून मुंबई ते अजिंठा हेलिकॉप्टर सेवेचे भाडेही पर्यटकांना परवडेल असेच ठेवण्याचा मानस एमटीडीसीने व्यक्त केला आहे.