महावितरण मोकळेच !
By Admin | Updated: September 25, 2014 00:54 IST2014-09-25T00:48:10+5:302014-09-25T00:54:25+5:30
उदगीर : उदगीर शहर व परिसरात विनापरवाना चालणाऱ्या ७ आरामिलवर वनविभागाने कारवाई केली होती़ आरोपींना ताब्यात घेऊन अटकही करण्यात आली़

महावितरण मोकळेच !
उदगीर : उदगीर शहर व परिसरात विनापरवाना चालणाऱ्या ७ आरामिलवर वनविभागाने कारवाई केली होती़ आरोपींना ताब्यात घेऊन अटकही करण्यात आली़ परंतु, ज्या महावितरणने या बेकायदा आरामीलला वीज जोडणी दिली ते मात्र अद्याप मोकळेच आहेत़
उदगीर शहर परिसरात गेल्या काही वर्षांपासून कोणतीही परवानगी न घेता आरामिल चालविण्यात येत होत्या़ यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली होती़ या याचिकेवरील निर्णयाच्या अनुषंगाने आठवडाभरापूर्वी वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक जी़एस़ साबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी ए़जी़ पाटील, आऱजी़ मुद्दमवार, वन परिमंडळ अधिकारी ए़बी़ पायाळ व कर्मचाऱ्यांनी बेकायदा आरामिलवर धाडी टाकल्या होत्या़ सात ठिकाणी धाडी टाकून तेथील मशीन्स वन विभागाने ताब्यात घेतल्या़ तसेच आरोपी शेख शमशोद्दीन रहीमोद्दीन पटेल, शेख खलील अब्दुल खादर, शेख इरफान उस्मानसाहब, शेख जियाऊल उस्मानसाहब, शेख बबलू अल्लाबक्ष, शेख युनूस शे़हबीब, महमद फारुख महमद ख्वाजा यांना अटक करुन न्यायालसमोर हजर करण्यात आले़ त्यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली़
दरम्यान, हे आरोपी आता जामिनावर सुटले आहेत़ गेली अनेक वर्षे विना परवाना आरामिल चालत असताना त्यांना महावितरणने सुरळीत वीजपुरवठा केला़ यासंदर्भात वनविभागाने महावितरणला वेळोवेळी पत्र पाठवून संबंधित आरामिल बेकायदा असल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याविषयी कळविले होते़ तरीही महावितरणने यावर कुठलीही कार्यवाही केली नाही़ त्यामुळे बेकायदा वृक्षांची कत्तल करुन आरामिल चालवणाऱ्या आरोपींना सहकार्य केल्याबद्दल महावितरणवरही गुन्हे नोंदविण्याची मागणी होत आहे़
१९८५ नंतर मराठवाड्यात एकाही आरामिलला परवानगी देण्यात आली नाही़ तरीही वर्षानुवर्षे बेकायदा आरामिल सुरु होत्या़ वनविभागाने कारवाया करुन उदगीरातील मिल बंद केल्या़ कुठल्याही दडपणाला बळी न पडता वन विभागाने अशाच कारवाया कराव्यात अशी अपेक्षा वृक्षमित्र डॉ़प्रकाश येरमे यांनी व्यक्त केली़ तसेच वन विभागाने वेळोवेळी पत्र देऊनही बेकायदा मिलधारकांची वीज खंडीत न करणाऱ्या महावितरणवर कार्यवाही व्हायलाच हवी, असे मतही वृक्षमित्र येरमे यांनी व्यक्त केले़