महावितरणच्या शाखा कार्यालयावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:40 IST2017-10-08T00:40:22+5:302017-10-08T00:40:22+5:30
हडको एन-१२ स्वामी विवेकानंदनगरातील महावितरणच्या कार्यालयावर शनिवारी दुपारी हडको एन-११ परिसरातील नागरिकांनी हल्ला केला.

महावितरणच्या शाखा कार्यालयावर हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : हडको एन-१२ स्वामी विवेकानंदनगरातील महावितरणच्या कार्यालयावर शनिवारी दुपारी हडको एन-११ परिसरातील नागरिकांनी हल्ला केला. भारनियमन रद्द करा, अशी मागणी करत जमावाने कार्यालयात तोडफोड केली. कर्मचा-यांनाही जमावाकडून धक्काबुक्की झाली.
शनिवारी दुपारी साडेबारा वाजता ३० ते ४० नागरिकांचा जमाव महावितरणच्या कार्यालयात घुसला. अचानक जमाव घुसल्यामुळे अधिकारी- कर्मचाºयांना काही सुचेना. भारनियमन रद्द करा, आमच्या भागाची वीज जोडणी दुस-या फिडरला जोडा, अशी मागणी करत जमावाने कार्यालयातील बायोमेट्रिक मशीन तोडून जमिनीवर फेकली. टेबलवरील वस्तू फेकल्या. टेबल आडवे केले. झटापटीत काही कर्मचारी किरकोळ जखमी झाले. अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश चव्हाण यांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
जमावाने एकच मागणी लावून धरली की, आमच्या वसाहतीचे भारनियमन रद्द करा. आम्ही नियमित वीज बिलाचा भरणा करतो, मग लोडशेडिंग कशामुळे. आम्हा दुस-या फीडरवरून वीज द्या. अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश चव्हाण यांनी त्यांना सांगितले की, भारनियमन रद्द करण्याची बाब आमच्या शाखा कार्यालयाच्या हातात नाही. वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात भारनियमन सुरू आहे. तुमच्या वसाहतीसाठी दुस-या फिडरवरून वीजपुरवठा करणे हे आम्हाला लगेचच शक्य नाही. त्यानंतरही जमावाचा संताप कायम होता. अखेर शाखा कार्यालयाच्या वतीने सिडको ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.