जालना बाजार समितीत मोसंबीची आवक मंदावली..!
By Admin | Updated: September 4, 2015 00:26 IST2015-09-04T00:26:09+5:302015-09-04T00:26:09+5:30
जालना : मोसंबीचा जिल्हा म्हणून जालन्याची ओळख आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देता मोसंबी लागवडीवर भर दिला

जालना बाजार समितीत मोसंबीची आवक मंदावली..!
जालना : मोसंबीचा जिल्हा म्हणून जालन्याची ओळख आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देता मोसंबी लागवडीवर भर दिला. मात्र नगदी पिकालाही दुष्काळाचा फटका बसत आहे. पाण्याअभावी मोसंबीचे फळ पूर्ण भरत नसल्याने आवक मंदावल्याचे चित्र असून, भावही गडगडले असल्याचे बाजार समितीतील सूत्रांनी सांगितले.
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत मोसंबीचा स्वतंत्र बाजार भरतो. मागील काही दिवसांपासून आवक नसल्याने मार्केट बंद होते. आठ ते दहा दिवसांपूर्वी ते पूर्ववत सुरु झाले आहे. परंतु आवक कमी होत असल्याचे व्यापारी तसेच बाजार समितीतून सांगण्यात आले. गुरुवारी मोसंबी मार्केटमध्ये ४०० क्विंटल आवक झाल्याचे सूत्रांनी सांगितले. १४ हजार ५०० ते १५ हजार ५०० रुपयां दरम्यान प्रति टनाचा भाव आहे. गतवर्षीच्या तुलनेत आवक तसेच भावातही तफावत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
अत्यल्प पावसामुळे सर्वत्र पाणीटंचाई आहे. यामुळे मोसंबी बागांना पाणी देणे जिकिरीचे झाले आहे. यामुळे मोसंबीचे फळ पूर्ण भरण्यास अडचणी येत आहेत. आकारही लहान असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
बाजार समितीचे भगवान शिंदे म्हणाले की, गुरुवारी मोसंबीची आवक ४०० क्ंिवटल एवढी झाली. काही दिवसांपासून आवक कमी झाली आहे. भावही १४ ते १५ हजार रुपये प्रति टन एवढा आहे.
दरम्यान गत काही वर्षांपासून मोसंबीलाही ग्रहण लागले आहे. पाण्याअभावी मोसंबी बागा जळून जात आहेत. गतवर्षी काही शेतकऱ्यांनी पाणीच नसल्याने स्वत:हून बागांवर कुऱ्हाड चालविली. या वर्षीही अशीच स्थिती येण्याची भीती शेतकऱ्यांना लागून आहे. जिल्ह्यात २५ हजार हेक्टर मोसंबीचे क्षेत्र असून, जालना, बदनापूर, अंबड, घनसावंगी तालुक्यात क्षेत्र चांगले आहे. दुष्काळाचे ग्रहण बागांना लागल्याचे चित्र आहे.