शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत १७ पोलीस ठाणे कार्यरत आहेत. पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षकपदावरील कर्मचाऱ्यांची एका ठाण्यात अथवा कोणत्याही शाखेत पाच वर्षे सेवा झाल्यावर बदली केली जाते. दरवर्षी सरासरी ३० टक्के कर्मचाऱ्यांची प्रशासकीय कारणाने बदली केली जाते. याशिवाय पोलीस कर्मचारी त्यांच्या बदलीसाठी विनंती अर्जही करू शकतात. पोलिसांच्या विनंतीवरूनही बदली होते. दरवर्षी ३१ मेपूर्वी बदली करण्याचा नियम आहे. मात्र, गतवर्षीपासून कोविड महामारीमुळे बदली झाल्यानंतरही कर्मचाऱ्यांना सोडले नव्हते. यावर्षी राज्य सरकारने सर्व प्रकारच्या बदल्यांना एक महिना स्थगिती दिली आहे. ही बाब लक्षात घेऊन स्थानिक पोलीस प्रशासनाने आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस ठाणेप्रमुख, गुन्हे शाखा, विशेष शाखा, मुख्यालय, बॉम्बशोधक आणि नाशक पथक, पासपोर्ट शाखाप्रमुखांना पत्र पाठवून त्यांच्या ठाण्यात बदलीपात्र कर्मचाऱ्यांची माहिती १७ मे पूर्वी सादर करण्याचे
निर्देश दिले. पोलीस ठाण्यात पाच वर्षे सेवेचा कालावधी पूर्ण करणारे कर्मचारी आणि ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना पाच वर्षे पूर्ण केले नाहीत; मात्र त्यांना बदलीसाठी विनंती करायची आहे, त्यांचे अर्ज घेऊन पाठविण्यास सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ही माहिती सध्या मागविण्यात आली असली तरी पोलिसांच्या बदल्या होतीलच याविषयी ठामपणे सांगता येत नसल्याचे सूत्राने सांगितले.