रोजगार हमी योजनेची बहुतांश कामे रखडली
By Admin | Updated: July 9, 2014 00:29 IST2014-07-09T00:08:36+5:302014-07-09T00:29:22+5:30
उस्मानाबाद : एकीकडे पाऊस लांबल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

रोजगार हमी योजनेची बहुतांश कामे रखडली
उस्मानाबाद : एकीकडे पाऊस लांबल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असतानाच दुसरीकडे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यात सुरू असलेल्या ८३९ कामांपैकी जवळपास ८० टक्के म्हणजेच ६८१ कामे अद्याप अपूर्ण असल्याची माहिती सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत समोर आली. यात पंचायत समितीकडील तब्बल ३६६ तर तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत २२७ कामे अपूर्ण असल्याचे सांगण्यात आले.
येथील तहसील कार्यालयात सोमवारी तहसीलदार सुभाष काकडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी रोहयोच्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला. यात अपूर्ण असलेली ६८१ कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना तहसीलदारांनी संबधित विभागाला दिल्या. तालुक्यात सध्या रोहयोअंतर्गत ८३९ कामे चालू आहेत. परंतु, यापैकी सामाजिक वनिकरण विभागाची १९, वनपरिक्षेत्र अधिकारी ७, तालुका कृषी अधिकारी २२७, उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग ०६, ल.पा.जि.प. उपविभागीय अधिकारी ०८, सार्वजनिक बांधकाम विभाग ३१, पाटबंधारे विभाग ४, ४, उप अभियंता जि.प १०, उपसा सिंचन उपविभाग १ या यंत्रणेकडील एकूण ३१५ तर पंचायत समितीअंतर्गत सुरू असलेली तब्बल ३६६ अशी एकूण ६८१ कामे अद्याप रखडली आहेत. (प्रतिनिधी)
पगाराचे विलंब शुल्क वसूल करणार
रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांना काम पूर्ण होऊनही पगार मिळत नसल्याच्या तक्रारी नेहमीच प्रशासनाकडे येतात. बैठकीत याच मुद्यावरून तहसीलदारांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. यापुढील काळात मजुरांचे पगार देण्यास विलंब झाल्यास विलंब शुल्काची रक्कम ही संबंधित खाते प्रमुखांकडून वसूल केली जाईल, असा इशाराही तहसीलदारांनी यावेळी दिला.