औंढा नागनाथ : बारा ज्योतिर्लिंगा पैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथ मंदिरामध्ये श्रावण उत्सवानिमित्त येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधांसाठी संस्थानने तयारी पूर्ण केली असून यासाठी सुमारे ५०० पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोमवारी पहाटे २.३० वाजता मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार तथा संस्थानचे अध्यक्ष शाम मदनूरकर यांनी दिली. श्री नागनाथ संस्थानचा विश्वस्थांची ११ आॅगस्ट रोजी बैठक घेण्यात आली होती. १५ ते १३ सप्टेंबर पर्यंत श्रावना निमित्त येथे भाविकांची मोठी गर्दी होती. भाविकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी स्काऊट गाईड व विविध महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करणार आहेत. तसेच भाविकांना सुलभ दर्शनासाठी रॅलींग, बाहेर पाण्यापासून संरक्षणासाठी दर्शनरांग मंडप उभारण्यात आला आहे. तसेच भाविकांसाठी अल्पदरात भोजनाचे आयोजन केले असून जवळपास ३०० हून अधिक भाविक या योजनेचा लाभ घेत आहेत. श्रावण महिण्यात ही संख्या वाढणार असल्याने जादा कर्मचाऱ्यांची या विभागावर नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून मंदिरात व परिसरात १६ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या ठिकाणी दोन उपविभागीय पोलिस अधिकारी, ६ पोलिस निरीक्षक, ३५ फौजदार, २५० पोलिस शिपाई, ४८ महिला पोलिस, ६५ होमगार्ड, दोन दंगा नियंत्रक पथक तसेच बाँम्ब शोधक व नाशक पथक, स्थानिक गुन्हे शाखा आतंकवाद विरोधी पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त पोलिस अधिक्षक कैलास कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली लावल्याची माहिती पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी दिली. ज्योतिर्लिंग असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने भाविकांनी मंदिरामध्ये नारळाचा वापर करण्यात येऊ नये असा ठराव संस्थानच्या वतीने व पोलिस प्रशासनाने घेतला असून तसेच आवाहन भाविकांना करण्यात आले आहे. परिवहन विभागाच्या वतीने हिंगोली, वसमत, कळमनुरी, जिंतुर, गंगाखेड, परभणी या आगारातून प्रत्येकी ५ -५ म्हणजे एकूण ३० बसेस भाविकांच्या सेवेसाठी सोडण्यात आल्याची माहिती आगार प्रमुख मुपाडे यांनी दिली आहे. मंदिर प्रांगणामध्ये आरोग्य केंद्र, पोलिस दक्षता कक्ष, विद्युत विभाग, नगरपंचायतीचे कर्मचारी स्थापन करण्यात आले आहेत. बैठकीस संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार शाम मदनुरकर, सचिव गजानन वाखरकर, सहसचिव विद्या पवार, विश्वस्त रमेश बगडीया, डॉ. किशन लखमावार, महेश बियाणी, गणेश देशमुख, अॅड. मुंजाभाऊ मगर, देविदास कदम, डॉ. पुरुषोत्तम देव, अॅड. कावरखे, शिवाजी देशपांडे, आनंद निलावार, डॉ. देवीदास खरात, निळकंठ देव, वैजनाथ पवार, शंकर काळे, बापुराव देशमुख व कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)
मध्यरात्रीपासूनच भाविकांच्या रांगा
By admin | Updated: August 17, 2015 00:04 IST