कडत्यासाठी मोंढा बंद
By Admin | Updated: October 15, 2016 00:29 IST2016-10-15T00:24:54+5:302016-10-15T00:29:40+5:30
म्ााजलगाव :ऐन सणासुदीच्या तोंडावर अचानक झालेल्या मोंढा बंदमुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

कडत्यासाठी मोंढा बंद
म्ााजलगाव : शेतकऱ्यांच्या विक्र ीसाठी आलेल्या मालातून क्विंटलमागे १ किलो नियमबाहय कडता घेण्याची सर्रास पध्दत सुरु असतानाही आणखीन कडता मिळावा, यासाठी मोंढयातील हमाल, मापाडयांनी अचानक मोंढा बंद करुन व्यापारी व शेतकऱ्यांना कोंडीत पकडले आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर अचानक झालेल्या मोंढा बंदमुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
हमाल मापाडयांच्या धोरणाविरोधात बाजार समितीने त्यांना तात्काळ काम सुरु करा अन्यथा लायसन्स रदद करण्याची नोटीस शुक्रवारी बजावली आहे. शेतकऱ्यांनी बाजारात विक्रीसाठी आणलेल्या मालातून १ किलो प्रमाणे बेकायदेशीर कडता काढून घेतला जात होता. या कडत्याच्या हिस्सेदारीवरुन महिन्यापूर्वी हमालमापाडी व व्यापारी यांच्या वादात तब्बल २२ दिवस मोंढा बंद होता. त्यावेळी बाजार समितीचे सभापती नितीन नाईकनवरे, सचिव डी.बी. फुके यांनी मध्यस्थी करुन व्यापाऱ्यांना अर्धा किलो व हमाल मापाडयायंना अर्धा किलो असा तोडगा काढून बाजार पुर्ववत सुरु केला. परंतु पुन्हा हमाल संघटनेने कडत्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. सध्या बाजारात शेतकऱ्यांचे धान्य मोठ्या प्रमाणात बाजारात येत असल्याची संधी पाहून हमालांनी बंद पुकारला असल्याचे शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी म्हटले आहे. हमाल, मापाडयांच्या या धोरणामुळे व वाद मिटलेला असतानाही हमाल मापाडयांनी चुकीची भूमिका घेतल्यामुळे हमाल मापाडयांना तात्काळ काम सुरु करा अन्यथा लायसन्स रदद करण्यात येईल, अशी नोटीस बाजार समितीकडुन काढण्यात आली असल्याची माहिती सचिव डी.बी. फुके यांनी दिली.
बाजार समितीची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे व हमाल मापाडयांमधून अनेक हमाल मापाडी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आपण कसे हमाल मापाडयांचे कैवारी आहोत हे दाखिवण्यासाठी पुन्हा जुना मुददा उकरुन काढून व्यापारी व शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा हा खटाटोप असल्याचेही दबक्या आवाजात बोलले जात आहे. शेतकऱ्यांची मात्र मोठी हेळसांड होत असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)