मुद्रा योजनेला अधिकाऱ्यांकडून खिळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2016 00:26 IST2016-02-08T23:46:41+5:302016-02-09T00:26:13+5:30
उस्मानाबाद : लघू उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल २०१५ रोजी मुद्रा बँकेचे उद्घाटन केले.

मुद्रा योजनेला अधिकाऱ्यांकडून खिळ
उस्मानाबाद : लघू उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल २०१५ रोजी मुद्रा बँकेचे उद्घाटन केले. मुद्रा योजनेत शिशू, किशोर आणि तरुण या गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले असून, कुठलेही तारण किंवा जामीनदार न घेता या योजनेअंतर्गत कर्ज वितरण करणे अपेक्षित आहे. असे असताना जिल्ह्यातील अनेक बँकांकडून मात्र कुठले ना कुठले कारण देवून ग्राहकांना हे कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसत आहे. याच अनुषंगाने सोमवारी जिल्ह्यातील विविध बँक शाखांत प्रतिनिधींनी या योजनेअंतर्गत कर्ज मागणी केली प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अनुभव आले. काही बँकांनी सध्या शेतकऱ्यांचे अनुदान वितरणाचे काम चालू असल्याचे तर काहींनी मार्च एन्डचे कारण सांगून नंतर येण्याचा सल्ला दिला. काही ठिकाणी तर उद्दिष्ट संपल्याचे सांगण्यात आले असून, तुळजापूरच्या एका शाखेत तर तसा फलकही डकविण्यात आला आहे.
उद्दिष्ट संपले...
कळंब : येथील प्रतिनिधीने दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत शाखाधिकारी पी. एन. काळे यांची भेट घेऊन या योजनेअंतर्गत कर्जाची मागणी केली. यावेळी त्यांनी उद्दिष्ट संपल्याचे सांगितले. यावेळी प्रतिनिधी व शाखाधिकारी यांच्यात झालेला हा संवाद.
४प्रतिनिधी : साहेब, मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज हवे आहे.
४मॅनेजर : बंद आहे
४प्रतिनिधी : कधी बंद झाले
४मॅनेजर : उद्दिष्ट संपले
४प्रतिनिधी : किती उद्दिष्ट होते
४मॅनेजर : ते सांगू शकत नाही
४प्रतिनिधी : का ?
४मॅनेजर : त्यासाठी माहिती अधिकार कायद्यानुसार अर्ज द्या
४ मॅनेजर : आपण कोण? (यावेळी प्रतिनिधीने आपली ओळख दाखविल्यानंतर व्यवस्थापकांनी सावध पवित्रा घेतला)
४मॅनेजर : दोन प्रकरणांचे उद्दिष्ट होते. वाटप केले.
४प्रतिनिधी : यासंदर्भातील उद्दिष्ट कोण देते? कोणत्या शासकीय यंत्रणेचे यावर नियंत्रण आहे?
४मॅनेजर : माहिती नाही.
ढोकी : उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील स्टेट बँक आॅफ हैैदराबाद शाखेत बँकेत खाते असलेल्याच एका ग्राहकास मुद्रा योजनेच्या कर्ज मागणीसाठी पाठविले असता तेथील शाखाधिकाऱ्यांनी या वर्षीचे टार्गेट संपले असून, एप्रिलनंतर या, असे सांगून परत पाठविले. यासंदर्भात प्रतिनिधीने शाखाधिकारी सुधीर झा यांच्याशी संपर्क साधला असता बँकेने मुद्रा योजनेअंतर्गत आतापर्यंत १७ शिशू, ९ किशोर आणि एक तरुण अशा २७ जणांना २० लाख रुपयांचे कर्ज वितरीत केले असल्याचे सांगितले. बँकेची कर्ज वाटप मर्यादा आठ कोटीची असताना आतापर्यंत नऊ कोटींचे वाटप केले आहे. शिवाय सध्या शेतकरी अनुदान वाटपाचे काम सुरू असून, कर्मचारी संख्याही कमी आहे. त्यामुळे तूर्त कर्जवाटप थांबविले असल्योचे ते म्हणाले.