मनी पेज/भारताचे यश
By | Updated: November 28, 2020 04:10 IST2020-11-28T04:10:48+5:302020-11-28T04:10:48+5:30
मुंबई : येथे आयोजित करण्यात आलेल्या एका ‘पॅनल डिस्कशन’मध्ये जागतिक पातळीवरील व्यावसायिक नेत्यांनी भारताच्या कोरोना साथकालीन यशाची प्रशंसा केली ...

मनी पेज/भारताचे यश
मुंबई : येथे आयोजित करण्यात आलेल्या एका ‘पॅनल डिस्कशन’मध्ये जागतिक पातळीवरील व्यावसायिक नेत्यांनी भारताच्या कोरोना साथकालीन यशाची प्रशंसा केली आहे. ॲव्हगॉल, ॲप्टर समूह, एएमपी एनर्जी आणि आयसीआयसीआय बँक कॅनडा या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रमुखांनी एकमुखाने म्हटले की, भारताने कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण कायम राखण्यात यश मिळविले आहे.
व्यावसायिक सल्लागार संस्था नेक्सडिग्मने अमेरिका-भारत व्यवसाय परिषद (यूएसआयबीसी) आणि आयसीआयसीआय बँक कॅनडा यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
ॲव्हगॉल नॉनओव्हनचे सीईओ शाचर रॅशिम यांनी सांगितले की, मध्य प्रदेशातील प्रकल्प उभारण्यासाठी आम्हाला राज्य सरकारे, स्थानिक संस्था आणि बँका यांच्याकडून भरपूर पाठबळ मिळाले. त्यामुळे आम्ही २०२१ च्या अखेरपर्यंत गुजरातेत आणखी एक प्रॉडक्शन लाइन उभारण्याचा विचार करीत आहोत.
इन्व्हेस्ट इंडियाचे उपाध्यक्ष विवेक अब्राहम यांनी सांगितले की, कोविड-१९मुळे नवी आव्हाने उभी केली तशाच काही संधीही निर्माण केल्या. यातील आरोग्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संधींचा भारताला लाभ झाला आहे. कारण या क्षेत्रांत भारताकडे नैसर्गिक शक्ती आहे. उदा. पीपीई कीट ही साथपूर्व काळात अगदीच छाेटी संधी होती. साथीनंतर ती प्रचंड मोठी झाली.
ॲप्टर समूहाचे भारत व दक्षिण आशिया विभागाचे अध्यक्ष कंवल टिकू यांनी सांगितले की, बाजारात भरपूर संधी, परवडणारे व कुशल मनुष्यबळ आणि भारताचा वस्तू उत्पादन स्थान म्हणून होत असलेला उदय हे भारतातील व्यवसायाचे तीन चालक आहेत. त्यांना सरकारचा मजबूत पाठिंबा आहे. भारत हा अशा एका बाजारात रूपांतरित होत आहे, ज्यात उत्तम माहिती, उत्तम संपर्क आणि जागतिक दर्जाची मागणी यांचा सुयोग्य समन्वय आहे.