महिला सदस्याचा ग्रामसेवकाकडून विनयभंग
By Admin | Updated: September 6, 2015 23:59 IST2015-09-06T23:32:59+5:302015-09-06T23:59:50+5:30
बीड : तेराव्या वित्त आयोगातून झालेली कामे बोगस आहेत, अशी तक्रार ग्रामसेवकाकडे करण्यासाठी गेलेल्या एका ग्रामपंचायत सदस्याचा विनयभंग करण्यात आल्याची तक्रार दाखल झाली

महिला सदस्याचा ग्रामसेवकाकडून विनयभंग
बीड : तेराव्या वित्त आयोगातून झालेली कामे बोगस आहेत, अशी तक्रार ग्रामसेवकाकडे करण्यासाठी गेलेल्या एका ग्रामपंचायत सदस्याचा विनयभंग करण्यात आल्याची तक्रार दाखल झाली. ग्रामसेवकानेही सदस्याच्या पतीने मारहाण केल्याची तक्रार पोलिसात दिल्याने प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वाद रविवारी चव्हाट्यावर आला आहे.
शिरूर तालुक्यातील येळंब ग्रामपंचायतीने तेराव्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीचा गैरवापर केल्याची तक्रार चार सदस्यांनी केली होती. यापैकी एका महिला सदस्याने शुक्रवारी सकाळी ११ वाजता कार्यालयात आल्यानंतर ग्रामसेवक एम. एम.जाधव यांना यासंदर्भात विचारणा केल्यानंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर या महिला सदस्याने केलेल्या तक्रारीनुसार जाधव यांनी उद्धटपणे वागणूक देत कार्यालयातून बाहेर ढकलत विनयभंग केला असल्याचे म्हटले आहे. ग्रामसेवकाने दिलेल्या तक्रारीनुसार बोगस कामे द्या, अशी मागणी या सदस्याने केली होती आणि यातूनच तिच्या पतीने कार्यालयात मारहाणीची तक्रार दिली आहे.
दरम्यान गावकऱ्यानी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून ग्रामसेवकाने दाखल केलेले खोटे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत अन्यथा आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबत आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. ग्रासेवक संघटनेने जाधव यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो तातडीने मागे घेतला नाही तर सोमवारपासून बेमुदत काम बंदचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)