आचारसंहितेपूर्वी घेतली आमदारांनी मंजुरी़़़
By Admin | Updated: July 24, 2014 00:11 IST2014-07-23T23:45:26+5:302014-07-24T00:11:49+5:30
लातूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लातूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी विकास निधीवर ‘लक्ष्य’ केंद्रित केले आहे़

आचारसंहितेपूर्वी घेतली आमदारांनी मंजुरी़़़
लातूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लातूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी विकास निधीवर ‘लक्ष्य’ केंद्रित केले आहे़ आचारसंहिता १५ आॅगस्टपर्यंत लागण्याची शक्यता ग्राह्य धरून प्रास्तावित कामांची बहुतांश आमदारांनी प्रशासकीय मान्यता घेतली आहे़ ८ कोटी ८५ लाख रूपयांची विविध कामे त्यांनी सुचविली आहेत़ त्यात सिमेंट रस्ते, स्मशानभूमीची संरक्षक भिंत, सार्वजनिक सभागृह, पाणीपुरवठा आदी विकास कामांचा समावेश आहे़ यापूर्वी ३ कोटी १५ लाख रूपयांची विकास कामे झाली असून, आता आचारसंहितेच्या आधी उद्घाटनाचा धुमधडाका उडविण्याच्या तयारीत नेतेगण आहेत़ ही कामे संपतील कधी, याचे कोडे मात्र जनतेला आहे़
मतदारसंघाच्या विकास कामांसाठी दरवर्षी २ कोटी रूपयांचा विकास निधी आमदारांना दिला जातो़ हा विकास निधी मतदारसंघातील सिमेंट रस्ते, वाचनालय, ग्रंथालय, सार्वजनिक सभागृह, स्मशानभूमीसाठी शेड व संरक्षक भिंत, चावडी बांधकाम आदी कामांसाठी वापरला जातो़ २००९-१० मध्ये जिल्ह्यातील आमदारांना फक्त २५ लाखांचा निधी मिळाला़ तर २०१०-११ मध्ये १ कोटी, २०११-१२ मध्ये १़५० कोटी मिळाला आहे़ या तिन्ही वर्षांतील सहाही आमदारांचा निधी खर्च झाला आहे़ २०१३-१४ पासून आमदार निधीमध्ये वाढ झाली. तो २ कोटीवर गेला आहे़ त्यामुळे जिल्ह्याला सहा विधानसभा मतदारसंघांसाठी १२ कोटी रूपयांचा निधी मिळाला होता़ २०१४-१५ मध्येही १२ कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे़ या निधीतील १० कोटी ९३ लाख रूपयांची विकास कामे आमदारांनी सुचित केली आहेत़
पूर्वी त्यातील २ कोटी ७ लाख रूपयांची विकास कामे पूर्ण झाली आहेत़ प्रास्तावित कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, आचारसंहिता लागली तरी या कामांना अडथळा नाही़ शिवाय, मागील वर्षातील एकाही लोकप्रतिनिधीचा निधी अखर्चित नसल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी एस़एस़रेड्डी यांनी सांगितले़
(प्रतिनिधी)
१३ कोटींची कामे़़़
२०१३-१४ मध्ये शहराचे आ़अमित देशमुख यांनी २ कोटी ९१ लाख ७५ हजार ५१४ रूपये, लातूर ग्रामीणचे आ़वैजनाथ शिंदे यांनी २ कोटी ४५ लाख ७४ हजार, निलंग्याचे आ़डॉ़शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी १ कोटी ४६ लाख २४ हजार, औशाचे आ़बस्वराज पाटील यांनी १ कोटी ७४ लाख ९ हजार ५७१ रूपये, उदगीरचे आ़सुधाकर भालेराव व अहमदपूरचे आ़बाबासाहेब पाटील यांनी २ कोटी रूपयांची कामे पूर्ण केली आहेत़
२००९-१० मध्ये लातूर शहराचे आ़अमित देशमुख यांना ३० लाख ६९ हजार ३५४ रूपये, लातूर ग्रामीणचे आ़वैजनाथ शिंदे यांना २५ लाख ८० हजार, निलंग्याचे आ़ डॉ़ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना ३३ लाख ८८ हजार, औशाचे आ़ बस्वराज पाटील यांना ३६ लाख २८ हजार, उदगीरचे आ़ सुधाकर भालेराव यांना २६ लाख ५० हजार, अहमदपूरचे आ़ बाबासाहेब पाटील यांना २६ लाख ५० हजार आमदार निधी मिळाला होता़ तो सर्व निधी खर्च झाला आहे़
राज्यमंत्री अमित देशमुख यांनी सर्वाधिक निधी खर्च केला आहे़ २०१३-१४ मध्ये २ कोटी ९१ लाख ७५ हजार ५१४ रूपये विविध विकास कामांवर खर्च झाला आहे़ २ कोटींच्या विकास निधीसह नियोजन समितीकडून त्यांना ९१ लाखांचा निधी विकास कामांना मिळाला आहे़
नियोजन समितीच्या बैैठकीत मान्यता़़़
जिल्हा विकास आराखड्याला पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत १८ जुलै रोजी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे़ या बैैठकीतच आमदार निधीतून होणाऱ्या विकास कामांनाही मंजुरी मिळाली आहे़
जिल्ह्यातील सहाही आमदारांनी एप्रिलपूर्वी मंजूर झालेल्या विकास कामांवरील निधी खर्ची केला आहे़ उर्वरित कामे सुचविली आहेत़ त्याची वर्कआॅर्डरही निघाली आहे़ या कामांना प्रारंभ झाल्यामुळे व काही कामांना मान्यता मिळाल्यामुळे आचारसंहितेचा कसलाही अडथळा राहणार नाही़ शिवाय मागील ४ वर्षांतील एक रुपयाही शिल्लक राहिलेला नाही, असे आमदार बाबासाहेब पाटील, आमदार वैैजनाथ शिंदे, आमदार सुधाकर भालेराव यांनी सांगितले़
एखादे काम सुरु झाले आणि ते अर्धवट राहिले तर त्यावरील निधी अखर्चित राहतो़ परंतु, अशी अर्धवट कामे जिल्ह्यात नाहीत, असे नियोजन अधिकारी म्हणाले़