किमान तापमान ८ अंशांवर गेल्याने जिल्हा गारठला...
By Admin | Updated: December 3, 2014 01:16 IST2014-12-03T01:09:23+5:302014-12-03T01:16:35+5:30
बालाजी थेटे; औराद शहाजानी जिल्ह्यात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे़ यंदा पाऊस कमी असला तरी थंडीचा कडाका मात्र गतवर्षीपेक्षा अधिक जाणवत आहे़

किमान तापमान ८ अंशांवर गेल्याने जिल्हा गारठला...
बालाजी थेटे; औराद शहाजानी
जिल्ह्यात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे़ यंदा पाऊस कमी असला तरी थंडीचा कडाका मात्र गतवर्षीपेक्षा अधिक जाणवत आहे़ निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी या सीमावर्ती भागात सर्वात कमी तापमानाची नोंद दरवर्षी होते़ गेल्या दहा दिवसांत किमान तापमानात घट होत चालली आहे़ मंगळवारी किमान ८़५ अंशाची नोंद झाली असून थंडीचा कडाका वाढत असल्याने शेकोट्याही पेटल्या आहेत़
जिल्ह्यातील अनेक साठवण तलाव व प्रकल्प कोरडेठाक आहेत़ अशा परिस्थितीतही थंडीचा कडाका वाढतच चालला आहे़ सीमावर्ती भाग असलेल्यान निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसर दरवर्षी थंडीमुळे गोठला जातो़ यावर्षीही थंडी वाढली असून किमान तापमान ८ अंशापर्यंत येत आहे़ गेल्या दहा दिवसांपासून किमान तापमानात १ ते २ अंशाचा फरक पडत आहे़ गतवर्षी ११८३ मिमी़ पावसाची नोंद झाल्याने थंडीचा कडाकाही अधिक होता़ मागील वर्षी ४ अंशापर्यंत सीमावर्ती भागात तापमान गेले होते़ यंदा पाऊस कमी असल्याने थंडी कमी होईल, असा अंदाज फोल ठरला़ वाढत्या थंडीतून सुटका करून घेण्यासाठी नागरिक व शेतकरी शेकोटी आणि उबदार कपड्याचा वापर करीत आहेत़ ४
औराद शहाजानी हे २५ हजार लोकवस्तीचे गाव़ सीमावर्ती भागातील मोठी बाजारपेठ आहे़ त्यामुळे दररोज सकाळी ७ वाजेपर्यंत बाजारात नागरिकांची लगबग असते़ मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून थंडी वाढल्याने दुकाने दहा वाजता उघडत आहेत़ बाजारात ग्राहकच येत नसल्याने गावात शुकशुकाट आहे़ सकाळी दहा वाजेनंतरच बाजारपेठेत वर्दळ आहे़ सायंकाळी ५ वाजताच पुन्हा गर्दी ओसरत असल्याने व्यवसायावरही परिणाम झाला आहे़ मागील वर्षी किमान तापमान ४ अंशापर्यंत गेले होते़ आता हळूहळू तापमान कमी होत जात असल्याने यावर्षी गतवर्षीसारखी अवस्था झाल्यास व्यवसाय थंडावणार आहे़