एमआयएम शहराध्यक्षाला पिटाळले
By Admin | Updated: May 6, 2016 00:02 IST2016-05-05T23:59:49+5:302016-05-06T00:02:56+5:30
औरंगाबाद : महापौर त्र्यंबक तुपे, आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्यासह पदाधिकाऱ्यांना अरेरावी करणारे एमआयएमचे शहराध्यक्ष अन्वर कादरी यांना संतप्त नागरिकांनी धक्काबुक्की करून तेथून पिटाळून लावले.

एमआयएम शहराध्यक्षाला पिटाळले
औरंगाबाद : खाम नदीतील अतिक्रमणांची पाहणी करण्यासाठी गेलेले महापौर त्र्यंबक तुपे, आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्यासह पदाधिकाऱ्यांना अरेरावी करणारे एमआयएमचे शहराध्यक्ष अन्वर कादरी यांना संतप्त नागरिकांनी धक्काबुक्की करून तेथून पिटाळून लावले. हर्सूल परिसरातील एकतानगरात सकाळी ही घटना घडली. कादरी हे नागरिकांऐवजी बिल्डरांची बाजू घेत असल्याचा आरोप नागरिकांनी पत्रकारांशी बोलताना केला.
पावसाळ्यापूर्वी खाम नदीतील अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रशासनाने दोन दिवसांपासून नदीपात्राची मोजणी सुरू केली आहे.
मात्र, संपूर्ण पात्राची मोजणी करण्यास नागरिकांचा विरोध होत असून, गुरुवारी नगरसेवक रूपचंद वाघमारे यांच्या मागणीवरून आयुक्त बकोरिया, महापौर तुपे, उपमहापौर राठोड हे सकाळी पाहणी करण्यासाठी एकतानगरमध्ये गेले होते. यावेळी नगरसेवक राजू वानखेडे, शिवाजी दांडगे, शहर अभियंता सखाराम पानझडे यांची उपस्थिती होती.
उपमहापौर राठोड यांनी कादरी यांना थांबवून आम्ही पदाधिकारी बोलतोय आपण नंतर बोला असे सांगितले. मात्र, कादरी यांनी मी शहराध्यक्ष आहे, प्रतिनिधीला तुम्ही थांबविता काय असा सवाल केला. त्यावर तुपे यांनी तुम्ही प्रतिनिधी आहात तर मग आम्ही कोण, असा सवाल केला. त्यानंतर चांगलीच बाचाबाची झाली. त्यानंतरही कादरी यांनी कोणाचेही न ऐकता आयुक्तांसमोर हातवारे करीत मोठमोठ्याने बोलत असल्याने आयुक्तांच्या अंगरक्षकाने कादरी यांना बाजूला नेऊन शांत राहण्याचे सांगितले. त्यानंतर ते नगरसेवकांना उद्देशून बोलू लागले. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी (पान २ वर)
एमआयएमचे शहराध्यक्ष म्हणाले...
महापौर आणि उपमहापौर यांनी गैरवर्तन केले. लोकांसाठी मी आयुक्तांशी बोलत होतो. मी कुठल्याही बिल्डरसाठी तेथे गेलो नव्हतो. ते गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते सोबत घेऊन फिरतात, याचे वाईट वाटते. मला कुणीही मारहाण केली नाही. मनपाच्या पदाधिकाऱ्यांनीच मला शिवीगाळ केल्याचा आरोप एमआयएमचे शहराध्यक्ष अन्वर कादरी यांनी केला.
कादरी यांनीच लुडबूड केली
नागरिकांनीच कादरीला लुडबूड करू नका, असे समजावून सांगत तेथून जाण्यास सांगितले. परंतु ते ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे नागरिकांनीच त्यांना तेथून चोप देऊन पिटाळले. त्यांना कुणीही शिवीगाळ केली नाही. उलट महापौर व इतर पदाधिकाऱ्यांसह आयुक्तांशी त्यांनी बोलण्याची उर्मट भाषा नागरिकांना आवडली नाही, असे उपमहापौर प्रमोद राठोड म्हणाले.