शिष्यवृत्ती वाटपात लाखोंचा घोटाळा !
By Admin | Updated: July 25, 2014 00:28 IST2014-07-24T23:27:38+5:302014-07-25T00:28:24+5:30
सोमनाथ खताळ , बीड समाजकल्याण विभागामार्फत सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचे वाटप केले जाते मात्र यामध्ये लाखो रूपयांचा घोटाळा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शिष्यवृत्ती वाटपात लाखोंचा घोटाळा !
सोमनाथ खताळ , बीड
समाजकल्याण विभागामार्फत सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचे वाटप केले जाते मात्र यामध्ये लाखो रूपयांचा घोटाळा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिष्यवृत्तीच्या वाटपात नियोजनाचा अभाव व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाचा फायदा घेत संबंधित शाळांनी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनींच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून लाखो रूपयांचा निधी हडप केल्याची तक्रार मनविसेने केली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्ती पोहोचली की नाही, याचा पुरावा सुद्धा समाजकल्याणकडे उपलब्ध नसल्याने संशय व्यक्त होत आहे.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुलींना समाजकल्याण विभागामार्फत सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचे वाटप प्रत्येक वर्षी करण्यात येते. २००३-०४ मध्ये सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू झाली.
या शिष्यवृत्ती अंतर्गत अनुसूचित जाती व व्ही.जे.एन.टी. प्रवर्गातील पाचवी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थिनींना दहा महिन्यासाठी प्रती महिना ६०० तर ८ ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना दहा महिन्यासाठी प्रती महिना १०० रूपयाची शिष्यवृत्ती दिली जाते.
मात्र प्रत्यक्षात ही शिष्यवृत्ती या विद्यार्र्थिनींपर्यंत पोहचत नाही. मुख्याध्यापक विद्यार्थ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्यांचे दस्तावेज समाजकल्याण कार्यालयात आणून जमा करतात, आणि आलेला लाखो रूपयांचा निधी स्वत:च्या खिशात घालत असल्याची तक्रार मनविसेचे शैलेश जाधव यांनी समाजकल्याणकडे दिलेला निवेदनात केली आहे.
विशेष म्हणजे मागील तीन वर्षापासूनच्या निधीचा घोळही समाजकल्याण अधिकाऱ्यांना अद्याप निघालेला नाही. २०११-१२ चा निधी २०१०-११ ला, २०१२-१३ चा निधी २०११-१२ ला वाटप करण्याचा महाप्रताप येथील अधिकारी करीत असल्याचे समोर आले आहे. प्रत्येक वर्षातील आलेली शिष्यवृत्ती त्या- त्या वर्षात का वाटप केली जात नाही? मागच्या वर्षाचा निधी जातो कोठे? यासारख्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरे समाजकल्याणकडे उपलब्ध नाहीत.
आम्हाला वेळ नाही तपासायला
यासंदर्भात सहायक आयूक्त आर.एम. शिंदे म्हणाले एवढे तपासायला आम्हाला वेळ नाही. असे घोटाळे होत असतील मी नवीनच आहे, असे सांगून त्यांनी हात झटकले. आमच्याकडे शिष्यवृत्ती वाटपाची माहिती उपलब्ध नाही, असे सांगून त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली़
सेम टू सेम!
२०११-१२ मधील काही शाळांच्या प्रस्तावाची यादी ‘लोकमत’च्या हाती लागली. यामध्ये अनेक विद्यार्र्थिनींच्या स्वाक्षऱ्या, पेन व अक्षर हे ‘सेम’ असल्याचे निदर्शनास आले. यावरून संस्थाचालक, मुख्याध्यापक, कर्मचारी यांनी मिलीभगत करून विद्यार्थिनींच्या शिष्यवृत्तीचा लाखो रूपयांचा निधी हडप केला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची स्वाक्षरी एकाच अक्षरात आणि सारखी असू शकत नाही, यामध्ये घोटाळा असून यामध्ये अधिकाऱ्यांचाही समावेश आहे असा आरोपही मनविसेचे शैलेश जाधव यांनी केला आहे.