‘एमआयडीसी’ची होणार पोलखोल !
By Admin | Updated: August 17, 2015 01:06 IST2015-08-17T00:28:53+5:302015-08-17T01:06:06+5:30
बीड : जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती संदर्भातील विविध अडचणींवर तोडगा काढण्यासाठी व वसाहतीतील गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी विधीमंडळ अंदाज समिती बीड

‘एमआयडीसी’ची होणार पोलखोल !
बीड : जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती संदर्भातील विविध अडचणींवर तोडगा काढण्यासाठी व वसाहतीतील गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी विधीमंडळ अंदाज समिती बीड ‘एमआयडीसी’ला (महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळ) भेट देवून बुधवारी पोलखोल करणार आहे. यामुळे उद्योगांऐवजी टोलेजंग इमारती उभारणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. ही समिती उद्योजकांशीही चर्चा करून अडचणी जाणून घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यात बीड, धारूर, आष्टी, पाटोदा, माजलगाव याठिकाणी औद्योगीक वसाहती आहेत, परंतु कोणत्याच वसाहतीत उद्योगांना पुरेल एवढी जागा उपलब्ध नाही. अपुऱ्या जागेतच उद्योग सुरू आहेत. या बाबत ‘लोकमत’ने ‘उद्योगांना ब्रेक’ या मथळ्याखाली वृत्त मालिका लावली होती. त्यानंतर आ.अमरसिंह पंडित यांनी यासंदर्भात अधिवेशनात आवाजही उठविला होता. येथील उद्योजकांनी आ.पंडित यांच्याकडे सोयी-सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारीही केल्या होत्या. यावर उद्योजकांनीही जिल्हाधिकारी, तत्कालीन पालकमंत्री यांच्याकडे लेखी, तोंडी तक्रारी केल्या. परंतु यावर अद्यापही तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे काही उद्योजकांना उद्योग सुरू करणे परवडणारे नव्हते. वीज, पाणी, रस्ते यासारख्या सुविधा नसल्याने उद्योगांना ब्रेक लागला होता.
आ.अर्जून खोतकर अध्यक्ष आणि आ.अमरसिंह पंडित सदस्य असलेल्या विधीमंडळ अंदाज समिती बीडच्या एमआयडीसीत बुधवारी भेट देणार असून सर्व आढावा घेणार आहे. तसेच बीडमध्ये काय अडचणी आहेत, यावर उद्योजकांशी चर्चा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)