एमआयडीसीतील ३०० उद्योग पडले बंद !
By Admin | Updated: February 4, 2016 00:36 IST2016-02-04T00:31:58+5:302016-02-04T00:36:19+5:30
सितम सोनवणे , लातूर लातूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे़ पाण्याच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यातील ५० टक्के उद्योगांवर संक्रात आली आहे़

एमआयडीसीतील ३०० उद्योग पडले बंद !
सितम सोनवणे , लातूर
लातूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे़ पाण्याच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यातील ५० टक्के उद्योगांवर संक्रात आली आहे़ आजच्या घडीला जिल्ह्यातील ५० टक्के उद्योग पाण्याअभावी बंद पडले आहेत़ ५० टक्के उद्योगांना घरघर लागली आहे़ तेही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
एमआयडीसीतील ६०० छोट्या-मोठ्या उद्योगांपैकी ३०० उद्योग बंद पडले आहेत. तर जिल्ह्यातील १२०० उद्योगांपैकी ६०० उद्योग पाण्याअभावी बंद आहेत. परिणामी, १० हजार मजुरांच्या मजुरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय, उद्योजकांचे महिन्याला १०० कोटींचे नुकसान होत आहे़
लातूर एमआयडीसीत सुमारे ६०० उद्योग व उदगीर, औसा, अहमदपूर, निलंगा या तालुक्यांत सुमारे ६०० उद्योग असे एकूण १२०० उद्योग आहेत़ लातूर शहरात ८० तर जिल्ह्यात २२२ डाळ मिल असून, यातील ५० टक्के डाळ मिल बंद आहेत़ तर ५० टक्के दाळ मिल चालू आहेत़ आहेत त्या मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी एका शिफ्टमध्ये हे उद्योग सुरु आहेत़ सिमेंट निर्मित वस्तू उद्योग शहरात ५० तर जिल्हाभरात १०० आहेत़ यातील ७५ टक्के उद्योग बंद आहेत़ त्यातील २५ टक्के उद्योग सुरु असले तरी जिल्हाभरात बांधकामांना बंदी असल्याने निर्मित उत्पादनाला मागणी नाही़ स्टील उद्योग ३ ते ४ असून, तेही बंदच आहेत़ शहरातील एमआयडीसीत १०० तर जिल्ह्यात १०० असे २०० वेअर हाऊस आहेत़ शेतकऱ्यांच्या शेतात उत्पन्नच झाले नसल्याने सर्व वेअर हाऊस रिकामेच आहेत़ तसेच शहरात व जिल्ह्यात किरकोळ उद्योग २०० आहेत़ फेब्रीकेशनचे २०० उद्योग जिल्ह्यात आहेत़ एकूणच जिल्ह्यात बांधकाम बंदी आहे़ परिणामी, दारे, खिडक्या आदी साहित्य निर्मिती होत नाही़ जे साहित्य निर्माण केले आहे़ त्यालाही मागणी नाही़ हा उद्योग एकूणच अन्य उद्योगांच्या आर्थिक चक्रातून सुरु असतो़ त्यामुळे अन्य उद्योजकावरचे मंदीचे सावट यावरही पडल्याने फेब्रीकेशन उद्योगालाही या मंदीचा सामना करावा लागत आहे़ जिल्ह्यात या उद्योगांच्या कामासाठी सुमारे २० हजार कामगार काम करत असून, ५० टक्के उद्योग बंद झाल्याने १० हजार मजुरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे़ त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढावली आहे़ लातूर जिल्ह्यातील पाणीटंचाईमुळे एमआयडीसीत केवळ आठवड्यातून एकदा पिण्यासाठीच पाणी देत आहेत़ जे उद्योग सुरु आहेत़ त्यांना टँकरच्या माध्यमातून घ्यावे लागत आहे़ ही परिस्थितीही जास्त दिवस चालणार नसून, एमआयडीसी आणि महापालिकेने पुढील काळात उद्योगांना पाणी दिले नाही तर सर्वच उद्योग बंद होतील़
परिणामी, कामगार आणि उद्योजक हे मोठ्या आर्थिक संकटात आल्याशिवाय राहणार नाहीत़