व्यापाऱ्यांनी गावांच्या विकासाकडे वळावे
By Admin | Updated: March 30, 2015 00:40 IST2015-03-30T00:30:37+5:302015-03-30T00:40:26+5:30
जालना: येथील व्यापारी, उद्योजकांनी मागील तीन वर्षांपासून घाणेवाडी जलसंरक्षक मंचच्या माध्यमातून घाणेवाडी जलाशयातील गाळ काढण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबविला आहे.

व्यापाऱ्यांनी गावांच्या विकासाकडे वळावे
जालना: येथील व्यापारी, उद्योजकांनी मागील तीन वर्षांपासून घाणेवाडी जलसंरक्षक मंचच्या माध्यमातून घाणेवाडी जलाशयातील गाळ काढण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबविला आहे. याच धर्तीवर आता व्यापाऱ्यांनी व उद्योजकांनी गावा- गावातील नदी, नाले रुंदीकरण करून गावांच्या विकासासाठी हातभार लावावा, असे आवाहन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
रविवारी सकाळी १० वाजता घाणेवाडी जलाशयातील गाळ उपसा कार्यक्रमास त्यांनी भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते. लोणीकर म्हणाले की, जालना शहराचा पाणी योजना करताना मागील सरकारने कोणतेही नियोजन केले नाही. शहराला पाणी पुरेल की नाही याचा अंदाज न घेता २३३ कोटीची नवीन योजना केली. तसे न करता याच घाणेवाडी तलावास २५ कोटी खर्च केला असता तर एक चांगला पर्याय उभा राहिला असता, असे सांगून लोणीकर म्हणाले की, जलसंरक्षक मंचने चांगल्या पद्धतीने लोकचळवळ उभी करून घाणेवाडीतील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढविली आहे. आणि अजुनही ते प्रयत्न करीतच आहे. या ठिकाणी कितीही प्रयत्न केले, तरी ते कमीच पडतील त्यामुळे व्यापाऱ्यांनी आता ग्रामीण भागाकडे वळावे. येथील प्रत्येक व्यापारी उद्योजकांनी गावे दत्तक घेवून त्या- त्या गावातील नदी, नाले रूंदीकरणासाठी पुढाकार घ्यावा. त्यामुळे ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होईल. प्रत्येक व्यापाऱ्यांनी आपल्या करातील २ टक्के रक्क अशा कार्यास दिल्यास विकासा मोठी मदत होईल.
व्यापाऱ्यांनी भरलेल्या करातून शासन ३२ टक्के रक्कम विकासासाठी वापरतात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी विविध करातून प्राप्त होणारी ६२ टक्के रक्कम देण्याचे जाहीर केले असल्याचेही लोणीकर यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, माजी आ. अरविंद चव्हाण, सुनील आर्दड, जलसंरक्षक मंचचे भाईश्री पटेल, सुनीलभाई रायठठ्ठा, शिवरतन मुदंडा, मोतीराम अग्रवाल, प्रवीण भानुशाली, हेमंत ठक्कर, विनायक देहेडकर, भावेश पटेल, शिवप्रकाश चित्तळकर, प्रीतम लोणगावकर, सुभाष देवीदान, अनिल सोनी, गोवर्धन अग्रवाल, सुखदेव बाजाज, घनश्याम जिंदल, जयंतीभाई गणात्रा, नरेश गुप्ता, हेमंत ठक्कर आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)