शेष निधीच्या हिशासाठी सदस्यांचा गोंधळ

By Admin | Updated: June 16, 2015 00:48 IST2015-06-16T00:37:59+5:302015-06-16T00:48:32+5:30

जालना : जिल्हा परिषदेच्या उपकरातून प्रत्येक गटातील विविध कामांसाठी मंजूर करावयाच्या मुद्यावरून सर्वपक्षीय सदस्यांनी सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घातला

Members' confusion for the balance of balance funding | शेष निधीच्या हिशासाठी सदस्यांचा गोंधळ

शेष निधीच्या हिशासाठी सदस्यांचा गोंधळ

 

जालना : जिल्हा परिषदेच्या उपकरातून प्रत्येक गटातील विविध कामांसाठी मंजूर करावयाच्या मुद्यावरून सर्वपक्षीय सदस्यांनी सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घातला. अखेर प्रत्येकी साडेसहा लाख रुपये देण्याचे एकमत झाल्यानंतर हा विषय मंजूर करण्यात आला. अंदाजपत्रक मंजूर झाल्यानंतर थकीत वाढीव उपकर, सामान्य उपकर, जमीन महसूल उपकर अंतर्गत प्राप्त ९ कोटी २८ लाख रुपयांच्या निधीतील ही रक्कम आहे. तर यापुर्वीच अन्य सात लाखांचा निधीही प्रत्येक गटास मंजूर करण्यात आलेला आहे.
यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्ष तुकाराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सभेस प्रारंभ झाला. यावेळी उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, कॅफो चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
राहुल लोणीकर, सतीश टोपे, संभाजी उबाळे, अ‍ॅड. संजय काळबांडे, भगवान तोडावत, बप्पासाहेब गोल्डे, बाळासाहेब वाकुळणीकर, अ‍ॅड. पंकज बोराडे यांनी संयुक्तपणे शेष निधीतून प्रत्येक गटास समान निधी देण्याची मागणी लावून धरली. मात्र अध्यक्ष तुकाराम जाधव व उपाध्यक्ष अनिरूद्ध खोतकर यांनी या निधीतून काही रक्कम अन्य कामांनाही देण्याची तयारी दर्शविली होती. त्यासाठी खोतकर यांनी वित्त सभापती या नात्याने आपली बाजू ठामपणे मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु सदस्य ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
प्रारंभी कार्यवृत्तांतास मंजुरी दिल्यानंतर विरोधी गटनेते सतीश टोपे यांनी त्यावर चर्चेची तयारी दर्शविली, मात्र अन्य सदस्यांनी व उपाध्यक्ष खोतकर यांनी त्यांना थाबविण्याचा प्रयत्न केला.
त्यावरून टोपे काही काळ संतप्त झाले होते. सभागृह सोडून जाण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. परंतु खोतकर यांनीच नंतर तुमचे म्हणणे मांडा, असे सांगितल्यानंतर टोपे यांनी आपले म्हणणे मांडले. वाढीव शेषमधून पदाधिकाऱ्यांसह सर्व सदस्यांना समान निधीचे वाटप करा, असे टोपे यांनी सांगितले. लोणीकर, उबाळे यांनीही ही बाजू लावून धरली. मात्र खोतकर यांनी त्यास विरोध दर्शविला.
यावेळी एल.के. दळवी, राजेश राठोड, सोनवणे, श्याम उढाण आदींनीही चर्चेत भाग घेतला. यावेळी अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजूर हे गाव खा. रावसाहेब दानवे यांनी ‘आदर्श सांसद ग्राम’ म्हणून दत्तक घेतले असून या गावासाठी काही भरीव निधी द्यावा, अशी मागणी सदस्य रामेश्वर सोनवणे यांनी केली. या मागणीला सुरूवातीला काहीसा अप्रत्यक्ष विरोध झाला. परंतु सोनवणे हे निधी द्यावा, या मागणीवर ठाम राहिले. तसेच त्यासाठी जि.प. अध्यक्ष तुकाराम सोनवणे व उपाध्यक्ष अनिरूद्ध खोतकर यांनीही विरोधी पक्षाच्या विरोधाला जुमानले नाही. तर सत्ताधारी सदस्यांची समजूत घालत राजूर येथे ५० लाखांचा निधी देण्याचा ठराव सर्वसंमतीने घेतला.
सिमेंट नाला बांध कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या १२ सदस्यांना वगळून अन्य सर्व सदस्यांना निधी देण्यात आला, हा मुद्दा अ‍ॅड. संजय काळबांडे यांनी उचलला. अन्य सदस्यांना सोबत घेऊन त्यांनी आपली कैफियत मांडली. त्यानंतर उपाध्यक्ष खोतकर यांनी याबाबत विचार करून या सदस्यांनाही निधी कशा पद्धतीने देता येईल, ते पाहू, असे सांगितले. त्यामुळे सदस्यांचे समाधान झाले नाही. नंतर विरोधी गटनेते टोपे यांनी आपण या सदस्यांना निधी मिळवून घेऊ, असे सांगितले.
तलावाकरीता जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही त्यांच्या जमिनीचा वाढीव मावेजा मिळालेला नाही. या मुद्यावरून सदस्यांनी सभागृहात गदारोळ केला. अ‍ॅड. संजय काळबांडे, अ‍ॅड. पंकज बोराडे व अन्य सदस्यांनी या प्रश्नावरून प्रशासकीय अधिकाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Members' confusion for the balance of balance funding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.