‘समांतर’वर मंत्रालयात उद्या बैठक
By Admin | Updated: July 7, 2015 00:55 IST2015-07-07T00:28:01+5:302015-07-07T00:55:54+5:30
औरंगाबाद : भाजपा पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने नगरविकास खात्याने समांतर जलवाहिनीच्या ठरावाबाबत ८ जुलै रोजी मंत्रालयात बैठक बोलाविली आहे

‘समांतर’वर मंत्रालयात उद्या बैठक
औरंगाबाद : भाजपा पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने नगरविकास खात्याने समांतर जलवाहिनीच्या ठरावाबाबत ८ जुलै रोजी मंत्रालयात बैठक बोलाविली आहे. या बैठकीला मनपाच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले आहे.
मनपातील सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण झाला आहे. मनपाच्या २० जून रोजीच्या सर्वसाधारण सभेत समांतर जलवाहिनीच्या कंत्राटदार कंपनीला डीआय पाईपऐवजी स्वस्तातील एचडीपीई पाईप टाकण्याची मुभा देणारा ठराव कायम करण्यात आला. भाजप पदाधिकाऱ्यांनी उघडपणे विरोध दर्शविल्यानंतरही महापौरांनी हा विरोध डावलत ठराव कायम केला. त्यामुळे दुखावलेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी २५ जून रोजी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेत हा ठराव विखंडित करण्याची मागणी केली. . या बैठकीला मनपाच्या संबंधित अधिकारी, पदाधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले आहे.
राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या दालनात होणाऱ्या या बैठकीचे पत्र सोमवारी सायंकाळी मंत्रालयातील विशेष कार्य अधिकारी विनायक चव्हाण यांनी मनपा आयुक्तांना पाठविले आहे.
बैठकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून राज्यमंत्री रणजित पाटील यांनी सोमवारी मनपाच्या अधिकाऱ्यांना मुंबईत बोलाविले होते. त्यानुसार मनपा आयुक्त प्रकाश महाजन, शहर अभियंता सखाराम पानझडे आणि कार्यकारी हेमंत कोल्हे हे सर्वसाधारण सभेतील ठरावाचा अहवाल घेऊन मुंबईत दाखल झाले. बैठकीलाही हे अधिकारी असतील.