‘खड्डे’बुजविण्यातच गेला कार्यकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:12 IST2017-10-27T01:11:52+5:302017-10-27T01:12:17+5:30
महापौर बापू घडमोडे यांचा दहा महिन्यांचा कार्यकाळ निव्वळ ‘खड्डे’ बुजविण्यात गेला. हे खड्डे रस्त्यांवरील नव्हते, तर त्यांच्या कार्यकाळात येणा-या अनेक अडचणींचे होते

‘खड्डे’बुजविण्यातच गेला कार्यकाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापौर बापू घडमोडे यांचा दहा महिन्यांचा कार्यकाळ निव्वळ ‘खड्डे’ बुजविण्यात गेला. हे खड्डे रस्त्यांवरील नव्हते, तर त्यांच्या कार्यकाळात येणा-या अनेक अडचणींचे होते. एवढे करूनही महापौरांना १०० कोटींच्या रस्त्यांच्या कामाचे नारळ फोडता आले नाही.
२८ आॅक्टोबर रोजी घडमोडे यांचा कार्यकाळ संपत आहे. शनिवारी सुटी असल्याने शुक्रवारी त्यांना आपल्या खुर्चीस अलविदा करावा लागणार आहे. गुरुवारी पत्रकारांसोबत गप्पा मारताना त्यांनी आपल्या भावनांना ‘वाट’मोकळी करून दिली. महापौर होताच अत्यंत कडक शिस्तीचे आयुक्त लाभले. त्यांनी तर एकानंतर एक अधिका-याला घरचा रस्ता दाखविला. त्यामुळे काम करायचे तरी कसे असा प्रश्न पडला होता. महापौर होताच आपण शहर खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली. जोपर्यंत शहर खड्डेमुक्त होणार नाही, तोपर्यंत कोणताच सत्कार स्वीकारणार नसल्याचे सांगितले होते. दहा महिने मुख्यमंत्री कार्यालयाचे उंबरठे झिजवून रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी आणला. त्यानंतर महापौरांनी सभागृहात सत्कार स्वीकारला. जेव्हा ही कामे होतील तेव्हा अर्धे तरी शहर खड्डेमुक्त होईल, असा दावाही बापू यांनी केला.
अलीकडेच मनपाला दुसरे आयुक्त मिळाले. त्यांच्यासोबत काम करताना अनुभव वाईट आल्याची प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली. सकाळी झालेला निर्णय दुपारी किंवा सायंकाळी बदलतो, असा आयुक्तांचा स्वभाव आहे, अशाही परिस्थितीत चांगले कामकाज केले. कर्मचाºयांचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडविले. पक्षातील हितचिंतकांनी १० महिन्यांच्या कालखंडात किती खड्डे केले यावर बोलण्याचे बापू यांनी टाळले.