शिक्षणात मराठवाड्याची भरारी..!

By Admin | Updated: June 23, 2014 00:30 IST2014-06-23T00:03:05+5:302014-06-23T00:30:07+5:30

औरंगाबाद : शालेय शिक्षणात गुणवंतांनी आपले कर्तृत्व सिद्ध केल्यामुळे मराठवाड्याला कुणाच्या मागे धावण्याची गरज नसल्याचे मत शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आज व्यक्त केले.

Marathawada fame in education ..! | शिक्षणात मराठवाड्याची भरारी..!

शिक्षणात मराठवाड्याची भरारी..!

औरंगाबाद : शिक्षणात मराठवाड्याने भरारी घेतली आहे. आयआयटीपासून वैद्यकीय क्षेत्रासह शालेय शिक्षणात गुणवंतांनी आपले कर्तृत्व सिद्ध केल्यामुळे मराठवाड्याला कुणाच्या मागे धावण्याची गरज नसल्याचे मत शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आज व्यक्त केले. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यासह दहावीत यश मिळविले. त्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा आज शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांच्यातर्फे आयोजित एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यावेळी आयुक्तांचे वडील श्रीराम कांबळे, आई जोहर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वत:चे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाल्याचे नमूद करून शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा म्हणाले, मनपा, जि. प., न. पा. शाळांमधून मिळणारे शिक्षण हे सीबीएसई पॅटर्नपेक्षा कमी नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षणाचा दर्जा आणखी वाढावा, यासाठी शिक्षण खात्याने अनेक उपक्रम हाती घेतले. आयुक्त डॉ. कांबळे आणि त्यांच्या शिक्षण विभागाने कौतुकास्पद काम केले आहे. यावेळी उपायुक्त सुरेश पेडगावकर, शहर अभियंता एस. डी. पानझडे, उपायुक्त रवींद्र निकम, हेमंत कोल्हे, अफसर सिद्दीकी, सिकंदर अली, शिक्षणाधिकारी ए. एम. शेख आदींंची उपस्थिती होती.
शिक्षण विकासाची चतु:सूत्री
शालेय शिक्षण हाच विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा पाया असल्यामुळे अभ्यासक्रम, शिक्षण अर्हता, प्रशिक्षण आणि शाळांमध्ये भौतिक सुविधा देण्याचे चतु:सूत्री धोरण राबविल्याचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा म्हणाले. दहावीचा अभ्यासक्रम कमजोर होता.
शिक्षकांची अर्हता वाढविणे महत्त्वाचे होते. ब्रिटिश कौन्सिलच्या मदतीने ६० हजार शिक्षकांना इंग्रजीचे धडे दिले. राज्य शासन, आयआयटीमध्ये करार करून एयू तंत्र वापरून शिक्षकांना भौतिकशास्त्रात पारंगत केले. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, बीजगणित शिक्षक या करारांतर्गत तयार होतील. शिक्षकांसाठी इस्रायल व शासनाच्या वतीने पुण्यात पहिले शिबीर घेण्यात आले.
३ कोटींचे साहित्य मनपाला
शिक्षणमंत्री म्हणाले, राज्यात औरंगाबादमधील मनपाच्या सर्व शाळांमध्ये ३ कोटी रुपयांच्या निधीतून शालेयउपयोगी साहित्य देण्यात आले आहे. ५ हजार ५३७ बेंच देण्यात आले. ३० लाख रुपयांच्या निधीतून मध्यान्ह भोजनपात्र दिले. वॉटरफिल्टर, क्रीडा साहित्य दिले. इस्कॉनच्या खिचडीमुळे शाळेची विद्यार्थी संख्या वाढली.
आयुक्त म्हणाले....
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण झाल्याचे नमूद करीत आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले, मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी कठीण परिस्थितीतून यश मिळविले. राज्यात दहावीचा निकाल चांगला, तो शिक्षणमंत्र्यांमुळे. शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी मनपा शाळांनाही भरभरून मदत केली.
गेल्या वर्षी मनपा शाळांचा निकाल ५३ टक्के लागला होता. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्यामुळे यावर्षीचा निकाल ८० टक्क्यांवर गेला आहे. शाळेतील अनेक अडचणी सोडविल्या. शिक्षकांनी रात्री वर्ग घेऊन कोचिंग केले.
२६ जून रोजी सिडको नाट्यगृह येथे मनपातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले गुणवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. पुरस्काराची रक्कम पालक ांनी विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणावर खर्च करावी, असे आवाहन आयुक्तांनी केले. मिटमिटा, मुकुंदवाडी, इंदिरानगर, शहाबाजार या शाळांना पाच पारितोषिक देण्याची घोषणा आयुक्तांनी केली.

Web Title: Marathawada fame in education ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.