अनेक कामे अडकली आचारसंहितेच्या कचाट्यात
By Admin | Updated: May 14, 2014 23:58 IST2014-05-14T23:18:54+5:302014-05-14T23:58:34+5:30
अंबड: यावर्षी सलग आलेल्या लोकसभा, विधान परिषद व विधानसभा निवडणुकांमुळे काही काळ अपवाद वगळता संपूर्ण वर्षभर आचारसंहितेचा अमंल राहण्याची शक्यता आहे.

अनेक कामे अडकली आचारसंहितेच्या कचाट्यात
अंबड: यावर्षी सलग आलेल्या लोकसभा, विधान परिषद व विधानसभा निवडणुकांमुळे काही काळ अपवाद वगळता संपूर्ण वर्षभर आचारसंहितेचा अमंल राहण्याची शक्यता आहे. या आदर्श आचारसंहितेचा बदल्यांसाठी इच्छुक अधिकारी, कर्मचारी व कामे मंजूर करुन घेण्यासाठी इच्छुक असलेल्या कंत्राटदारांनी चांगलाच धसका घेतल्याचे चित्र अंबड तालुक्यात पाहावयास मिळत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेली आदर्श आचारसंहिता राज्यातील तिसर्या टप्प्यातील म्हणजेच २४ एप्रिल रोजीच्या मतदानानंतर काही प्रमाणात शिथिल करण्यात आली. मात्र ही आदर्श आचारसंहिता पूर्णपणे शिथिल होण्यासाठी २४ मेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील आ.सतीश चव्हाण यांची मुदत १९ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे जुलै महिन्यात विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठीची निवडणूक होण्याची शक्यता आहे. यासाठी पदवीधर मतदार नाव नोंदणीची प्रक्रियासुद्धा सुरु करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करुन निवडणुकीची घोषणा होण्यास एक महिन्याचा म्हणजेच जून महिन्याच्या मध्यापर्यंतचा अवधी लागण्याची शक्यता आहे. जून महिन्याच्या मध्यापर्यंत पदवीधर विधान परिषद मतदारसंघासाठीच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे जाणकारांचे मत आहे. शासकीय नियमानुसार निवडणुकांची घोषणा करताच आदर्श आचारसंहिता लागू होते. मराठवाडा पदवीधर विधान परिषद मतदारसंघामध्ये मराठवाड्यातील सर्व म्हणजेच औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी व नांदेड या आठही जिल्ह्यांचा समावेश होतो. या अनुषंगाने साहजिकच विधान परिषद निवडणुकांसाठी जारी करण्यात आलेली आदर्श आचारसंहिता अंबड तालुक्यास लागू होणार आहे. या सर्व शक्यता लक्षात घेत बदल्यांसाठी इच्छुक असलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच कंत्राट मंजूर करुन घेण्यासाठी धडपडणारे कंत्राटदार वर्गाने आपल्या हालचाली तीव्र केल्या आहेत. मे महिन्याच्या शेवटी आचारसंहिता पूर्णपणे शिथिल होताच आपल्या बदल्या करुन घेण्यासाठी करण्यात येणार्या कसरती व कंत्राटे पदरात पाडण्यासाठी करावे लागणारे जोडतोड यासाठी या सर्वांनी आतापासूनच सुरुवात केल्याचे दिसत आहे. यामध्ये किती अधिकारी, कर्मचारी आपल्या इच्छितस्थळी जातात तसेच किती कंत्राटदार इच्छित कंत्राटे आपल्या पदरात पाडून घेण्यात यशस्वी होतात हे आगामी काळात कळेलच. आदर्श आचारसंहितेचा अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांनी मोठा धसका घेतला आहे, एवढे मात्र खरे. (वार्ताहर) आदर्श आचारसंहितेचा अंमल विधानसभा निवडणूक आॅक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. म्हणजेच आॅगस्ट महिन्याच्या शेवटी अथवा सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात येईल. विधानसभा निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेली आदर्श आचारसंहिता निवडणूक निकालानंतर शिथिल करण्यात येईल. अशाप्रकारे जवळपास सन २०१४ च्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत जून महिन्यातील सुरुवातीचे पंधरा दिवस व आॅगस्ट महिना वगळता आदर्श आचारसंहितेचा अंमल राहण्याची शक्यता आहे.