केबीसीच्या कचाट्यात अनेक गावे सापडली
By Admin | Updated: July 24, 2014 00:28 IST2014-07-23T23:55:11+5:302014-07-24T00:28:54+5:30
इलियास शेख, कळमनुरी शहरासह तालुक्यातील बहुतांश गावात केबीसीने आपले जाळे तयार केले होते. कमी कालावधीत दामदुप्पट रक्कमेच्या आमिषाने अनेक गावे केबीसीच्या कचाट्यात सापडली आहेत.
केबीसीच्या कचाट्यात अनेक गावे सापडली
इलियास शेख, कळमनुरी
शहरासह तालुक्यातील बहुतांश गावात केबीसीने आपले जाळे तयार केले होते. कमी कालावधीत दामदुप्पट रक्कमेच्या आमिषाने अनेक गावे केबीसीच्या कचाट्यात सापडली आहेत.
मागील चार वर्षांपासून केबीसीने ग्रामीण भागात आपले जाळे निर्माण केले. अडीच वर्षांत १७ हजार २०० रुपयांचे ५१ हजार रुपये देण्याचे आमिष कंपनीने गुंतवणूकदारांना दिले होते. एजंटाचे जाळे तयार केल्याने एजटांनी गावोगाव पिंजून काढून अनेकांना रक्कमा गुंतविण्यास सांगितले. आमिषाला बळी पडून अनेकांनी सोने, जवळील मालमत्ता, शेती विकून केबीसात पैसे गुंतवले. गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी टप्प्या-टप्प्याने परतावा दिला. त्यामुळे सहजपणे सर्वांचाच विश्वास बसला. लखपती होण्याची भुरळ एजंट गुंतवणूकदारांना घालत होते. एजंटाच्या अलीशान गाड्या, त्यांची स्टाईल यामुळे सर्व सामान्यांना भुरळ पडली. तालुक्यातील एकाने ५० लाख रुपये रोख केबीसीत गुंतवल्याची चर्चा आहे. हा व्यक्ती कोण? याची चौकशी पोलिस करीत आहेत. येथील मुरलीधर गायकवाड यांनी केबीसीत २ लाख ६ हजार ८०० गुंतवले आहेत. तालुक्यात २० ते २५ एजंट असून यात १० कोटीच्याजवळपास गुंतवणूक झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. लवकर श्रीमंत होण्याच्या लालसेने एजंटांनी आपले सगेसोयरे, नातेवाईक, मित्र आदींना केबीसीत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. एजंट जवळचाच असल्याने कोणीही पोलिसांत तक्रार द्यायला तयार होत नाही. येथील पोलिस ठाण्यात एकही तक्रार दाखल झालेली नाही. केबीसीत किती रक्कम गुंतवली? हे सांगण्यास कोणीही तयार नाही. तालुक्यात कळमनुरी शहरासह आखाडा बाळापूर, वारंगा फाटा, डोंगरकडा, वाकोडी, खापरखेडा, सालवाडी, मसोड, सालेगाव, रुपूर, नांदापूर, गौळबाजार या गावांसह अनेक गावे केबीसीबाधीत झाली आहेत. सगळीकडे केबीसीचीच चर्चा आहे. कोणी किती रक्कमा गुंतवल्या? याचे रेकॉर्ड नसल्याने काहीही सांगता येणे कठीण आहे. केबीसीच्या गाड्या रस्त्यावर फिरत होत्या. आता त्याही फिरणे बंद झाल्या आहेत. अनेकजण रक्कमा गुंतवून ‘तेरी भी चुप अन् मेरी भी चुप’ या म्हणीप्रमाणे घरी शांत बसले आहेत. एजंट व गुंतवणूकदार किती? तसेच किती रक्कम यात गुंतवल्या गेली? हे सांगणे सध्यातरी सांगणे कठीण आहे.