अनेक विभागांत यंदा विद्यार्थी संख्या कमी...
By Admin | Updated: July 12, 2016 01:04 IST2016-07-12T00:21:01+5:302016-07-12T01:04:00+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अनेक विभागांत पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थी असल्याचे दिसत असून, काही विभागांत तर आठ ते दहा विद्यार्थ्यांचेच प्रवेश झालेले आहेत.

अनेक विभागांत यंदा विद्यार्थी संख्या कमी...
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अनेक विभागांत पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थी असल्याचे दिसत असून, काही विभागांत तर आठ ते दहा विद्यार्थ्यांचेच प्रवेश झालेले आहेत. यामुळे विद्यापीठात उत्तम दर्जाचे संशोधन व्हावे, अशी अपेक्ष़ा असताना विद्यार्थ्यांची संख्याच रोडावल्याचे चित्र आहे.
गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठातील मानव्य इमारतीमध्ये असलेल्या अनेक विभागांत विद्यार्थ्यांचा दुष्काळ असल्याची परिस्थिती आहे. तर विज्ञान विभागांमध्येही चार ते पाच विभाग सोडले तर विद्यार्थी संख्या कमीच आहे. विज्ञान विभागापेक्षा कला आणि सामाजिकशास्त्रे अभ्यासक्रमांची स्थिती बिकट असल्याचे दिसत आहे.
प्राप्त माहितीनुसार विद्यापीठातील भाषा विभागांत मराठी, हिंदी या विभागांत पहिल्या वर्षीच्या पूर्ण जागा भरल्या गेल्या नाहीत. गेल्या काही वर्षांत या दोन विभागांत संपूर्ण जागा भरल्या जात नाहीत. मराठी विभागात एम. ए. प्रथम वर्षासाठी यंदा सुमारे ६० पैकी ३५ जागा भरल्या गेल्या आहेत. हिंदी आणि संस्कृत विभागांतही हीच स्थिती आहे. सामाजिकशास्त्रे विभागांतील लोकप्रशासन विभागात ७० पैकी १६ जागा भरल्या गेल्या आहेत. शिक्षणशास्त्र विभागात ५० पैकी ३० जागा भरल्या गेल्या आहेत. मात्र, या विभागात गेल्या वर्षीपेक्षा प्रतिसाद चांगला आहे. इतिहास, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र आदी विभागांत पटसंख्येपेक्ष़ा कितीतरी विद्यार्थी कमी असल्याचे दिसते.
विज्ञान विभागात पर्यावरणशास्त्र विभागात प्रथम वर्षाच्या ३२ पैकी जागा भरल्या गेल्या आहेत. प्राणिशास्त्र विभागात ७० पैकी ५२ जागा भरल्या गेल्या आहेत. जैवरसायनशास्त्र विभागात २२ पैकी १८ जागा भरल्या गेल्या आहेत. संगणकशास्त्र विभागातील एम.एस्सी. कॉम्प्युटर सायन्सला ३२ जागा असून, सर्व जागा भरल्या गेल्या आहेत. मात्र एम. एस्सी. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागात ३२ पैकी केवळ १० जागा भरल्या गेल्या आहेत. या अभ्यासक्रमाची फी अधिक असल्याने तेथे पटसंख्या रिक्त राहते. तेथे आणखी चार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा या विभागाला प्रतिसाद चांगला आहे. गणितशास्त्र आणि संख्याशास्त्र विभागातही उत्तम प्रतिसाद नाही. केमिकल टेक्नॉलॉजी विभागाचे प्रवेश तंत्रशिक्षण विभागातर्फे केले जातात. त्यामुळे अद्याप प्रवेशप्रक्रिया चालू आहे.