अनुदानाविषयी अनेक तक्रारी
By Admin | Updated: July 6, 2014 00:12 IST2014-07-05T23:52:28+5:302014-07-06T00:12:49+5:30
परभणी : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये झालेल्या गारपिटीची नुकसान भरपाई देताना भेदभाव झाल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

अनुदानाविषयी अनेक तक्रारी
परभणी : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये झालेल्या गारपिटीची नुकसान भरपाई देताना भेदभाव झाल्याच्या तक्रारी वाढत आहेत. जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात जिल्हाभरात गारपीट व अवकाळी पाऊस झाला होता. या नुकसानीचे पंचनामे करुन काही शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. परंतु, पंचनामे करताना अनेक गावे, शेतकरी वगळण्यात आले. कर्मचाऱ्यांनी भेदभाव केला, अशा तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत.
गावांचा समावेश करा
शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन दिले असून गारपिटीमुळे शेतकरी हाताश झाला आहे. त्याच्यावर संकट ओढवले असून अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी बहुतांश गावे अनुदानाच्या यादीतून वगळण्यात आली. परभणी तालुक्यातील देवठाणा, संबर, दुरडी, पिंपळगाव टोंग, धारणगाव, धार, मुरुंबा, सावंगी खु., मटकऱ्हाळा या गावांचा अनुदानाच्या यादीत समावेश करुन अनुदान वाटप करावे, अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेचे रंगनाथ चोपडे, विशाल पाते, गणेश पवार, भास्कर खटींग, रामेश्वर डुकरे, पंडितराव पवार, मधुकर चोपडे, बन्सीराम डुकरे, भाऊसाहेब चव्हाण, निवृत्ती चव्हाण, संतोष पाते, रामा खटिंग, किशोर ढगे, देवीदास झाडे आदींनी दिला आहे.
खोटे पंचनामे केले
मानवत तालुक्यातील लोहरा येथे गारपीट नुकसानीचे पंचनामे बोगस करण्यात आल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. कमी जमीन असताना जास्त जमिनीचे पंचनामे दाखवून शासनाची फसवणूक करण्यात आली. काही शेतकऱ्यांना नुकसान झाले असतानाही अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले. तलाठी व कृषी सहाय्यकाने चावडी वाचन न करताच यादी तयार केली. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करावी व नुकसानीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी लोहरा येथील ३५ ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. (प्रतिनिधी)
बोगस पंचनामे
पालम तालुक्यातील सायाळा येथील गारपिटीचा सर्वे करण्यात आला. परंतु, पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या नावे २ हेक्टरच्या आत जमीन आहे, अशा शेतकऱ्यांनासुद्धा ५ ते २० हजार रुपये मदत मिळाली. परंतु, ज्यांच्या नावे १२ ते १८ एकर जमीन आहे, अशा शेतकऱ्यांना ३ ते ५ हजार रुपयांपर्यंत मदत दिली आहे. त्यामुळे फेरसर्वे करुन योग्य त्या शेतकऱ्यांना मदत द्यावी व जाणीवपूर्वक मदतीपासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी लक्ष्मण चवरे, श्यामराव आव्हाड, नरहरी कोल्हे, विष्णूदास चवरे, गजानन चवरे, रामकिशन नवघरे, राजेभाऊ नवघरे, शंभूदेव खटीेंग आदींनी केले आहे.
शेतकरी अनुदानापासून वंचित
मानवत तालुक्यातील वझर खु.येथील अनेक शेतकरी गारपीट अनुदानापासून वंचित आहेत. या गावात गारपिटीमुळे सर्वच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पंचनाम्यासाठी आलेल्या पथकाने ठरावीक शेतकऱ्यांना भेटून पंचनामा केला. काही लोकांची जाणूनबुजून नावे टाकली नाहीत. तर काहींना व्यवस्थित भरपाई दिली नाही. पंचनाम्याचे चावडीवाचनही झाले नाही. या सर्व प्रकाराची चौकशी करावी व संबंधितावर कारवाई करावी. त्याचप्रमाणे भरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी वझूर खु. येथील आशाबाई गिराम, मारोती शिंदे, परमेश्वर कटके, रतन शिंदे, लक्ष्मण शिंदे, नारायण राठोड, विलास वाहुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.