मनपाचा डांबर प्लांट
By Admin | Updated: December 18, 2015 23:46 IST2015-12-18T00:09:27+5:302015-12-18T23:46:24+5:30
औरंगाबाद : रस्त्यांचे खोदकाम केल्याच्या बदल्यात केबल कंपन्या, व्यक्ती आणि संस्थांकडून दिलेली रक्कम केवळ रस्ता दुरुस्तीसाठीच वापरली जावी यासाठी महापालिकेने स्वतंत्र बँक खाते सुरू केले आहे.

मनपाचा डांबर प्लांट
औरंगाबाद : रस्त्यांचे खोदकाम केल्याच्या बदल्यात केबल कंपन्या, व्यक्ती आणि संस्थांकडून दिलेली रक्कम केवळ रस्ता दुरुस्तीसाठीच वापरली जावी यासाठी महापालिकेने स्वतंत्र बँक खाते सुरू केले आहे. तसेच पॅचवर्कची कामे वेळीच करता यावीत याकरिता स्वत:चाच डांबर तयार करण्याचा प्लांट उभा करण्याचा प्रस्ताव मनपाच्या विचाराधीन आहे.
शहरातील रस्त्यांची चाळणी झाली आहे. तरीही तिजोरीत पैसे नसल्यामुळे मनपाकडून आतापर्यंत पॅचवर्कची कामे होऊ शकलेली नाहीत. ही बाब लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने आता स्वतंत्र बँक खाते सुरू केले आहे. यापुढे रस्त्यांचे खोदकाम केल्याच्या बदल्यात विविध केबल कंपन्या, व्यक्ती आणि संस्थांनी जमा केलेली रक्कम या खात्यात टाकून ती रस्ता दुरुस्तीसाठीच वापरली जाणार आहे. याशिवाय पॅचवर्कर्ची कामे वेळीच करता यावीत यासाठी महापालिका स्वत:चा डांबर तयार करण्याचा प्लांट उभारण्याचाही विचार करीत आहे. सध्या रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. गणेशोत्सवाच्या काळात पॅचवर्क ची थातुरमातुर कामे करण्यात आली; परंतु काही दिवसात हे खड्डे पुन्हा उखडले. रस्ते दुरुस्तीसाठी तसेच खड्डे बुजविण्यासाठी कंत्राटदार अनेक कारणे सांगून टाळाटाळ करतात, तर कधी कधी पूर्वीची थकलेली बिले मिळाली नसल्याने ते काम करण्यास तयार होत नाहीत. म्हणून भविष्यात अशी कामे करण्यासाठी डांबर तयार करण्याचा प्लांट सुरू करण्याचा महापालिकेचा विचार आहे. त्यासाठी सुमारे ६० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हा प्लांट सुरू झाला तर वेळीच कामे करणे शक्य होणार आहे.