लोकसहभागातून महाराष्ट्र पाणीदार होईल
By Admin | Updated: May 19, 2015 00:49 IST2015-05-19T00:21:32+5:302015-05-19T00:49:46+5:30
लातूर / किनगाव: देशातील राजकीय व्यक्ती तसेच संत व समाजाच्या सहयोगातून पाण्याचा दुष्काळ नाहीसा होवून राष्ट्र पाणीदार होईल़

लोकसहभागातून महाराष्ट्र पाणीदार होईल
लातूर / किनगाव: देशातील राजकीय व्यक्ती तसेच संत व समाजाच्या सहयोगातून पाण्याचा दुष्काळ नाहीसा होवून राष्ट्र पाणीदार होईल़ त्यासाठी मेहनत व पैसा खर्च करण्याची गरज आहे़ राज्यस्थानने गेल्या ३१ वर्षात ११ हजार तलाव बांधले़ त्यामुळे तेथील दुष्काळ संपुष्टात आला आहे़ दुष्काळमुक्त व पाणीदार होण्यासाठी सामुहीक मेहनत करण्याची गरज आहे, असे मत प्रसिद्ध जलतज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी सोमवारी लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी आयोजीत केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले़
जलयुक्त शिवार अभियानातील कामाची पाहणी सोमवारी लातूर जिल्ह्यात त्यांनी केली़ या पाहणीदरम्यान अहमदपूर तालुक्यातील परचंडा, बामणी, शिवणी, उमरदरा, सावरगाव येथे नाला खोलीकरण व सरळीकरण कामाचा शुभारंभ झाला़ तसेच लातूर शहरातील दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात डॉ़ राजेंंद्रसिंह यांनी टंचाईमुक्तीचा कानमंत्र दिला़ जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, माजी आमदार पाशा पटेल, उपविभागीय अधिकारी स्वाती शिंदे, गटविकास अधिकारी नितीन दाताळ, पंचायत समिती सभापती आऱ डी़ शेळके, जि़ प़ सदस्य चंद्रकांत मद्दे, एऩआऱ पाटील, सिद्धार्थ सूर्यवंशी, विठ्ठलराव बोडके आदींची उपस्थिती होती़ यावेळी डॉ़ राजेंद्रसिंह राणा म्हणाले, लोकप्रतिनिधी, जनता आणि शासन या तिघांनी एकत्र येऊन काम केल्यास जलसंकटाचा सामना करता येणार आहे़ राज्यकर्ते, समाज व संतांनी आपापल्या भूमिका प्रमाणिकपणे पार पाडल्या तर देशातला दुष्काळ नाहीसा होईल़ राजस्थानपेक्षा महाराष्ट्र राज्य सुधारीत आहे़ राजस्थानमध्ये ३१ वर्षात ११ हजार तलाव बांधले़ यामुळे सरकारी मदत न घेता तेथील दुष्काळ नाहीसा झाला़ पाण्याचे संकट मोठे आहे़ या संकटाशी लढायचे असेल तर जलयुक्त शिवार अभियानात लोकांचा सहभाग महत्वाचा आहे़ लोकसहभागाशिवाय जलयुक्त शिवार अभियान यशस्वी होऊ शकणार नाही़ लोकांनी आता राजकारण्यांच्या मागे न धावता ढगांच्या मागे धावले पाहिजे़ तरच दुष्काळ नाहीसा होईल़ पाणीटंचाई किंवा दुष्काळ घालवायचा असेल तर आमदार, खासदारांच्या हातात हात घालून नव्हे, तर ग्रामस्थांच्या हातात हात घालून कामे करावी लागतील़ राजस्थानचा विकास तेथील शेतकऱ्यांनी केला़ वाहते पाणी जमीनित आडवून व जिरवून पाणीपातळीत वाढ केली़ आपल्याला हे का शक्य नाही, असा सवाल उपस्थित करुन डॉ़ राजेंद्रसिंह राणा म्हणाले, जलवायु परिणामामुळे दुष्काळ पडत आहे़ पावसाचे चक्र बदलले आहे़ सूर्याच्या उष्णतेने वर्षभरात ३ मीटर पाण्याची वाफ होते व पावसाच्या पाण्यामुळे दीड फुट पाणीपातळीत घट होते़ पाणी अडविण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)