छत्रपती संभाजीनगर : २० ते ३६ टक्क्यांपर्यंत व्याजदराचे आमिष दाखवून एलएफएस ब्रोकिंग कंपनीने देशभरात ६ हजारांपेक्षा अधिक गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. देशभरात गाजत असलेल्या या घोटाळ्यातील कंपनीचा महाराष्ट्र प्रमुख विनोद बाळासाहेब माने (३०, रा. शिवशंकर कॉलनी, तानाजी चौक) याला मंगळवारी अटक केली. शहर आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. न्यायालयाने त्याला ७ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.
शहरात २० फेब्रुवारी रोजी या कंपनीवर फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहरात कंपनीचे माने व शहर व्यवस्थापक विनोद त्र्यंबक साळवे यांनी ३५पेक्षा अधिक गुंतवणूकदारांकडून ३ कोटींपेक्षा अधिक रक्कम हडप केली. जुलै २०२३ मध्ये कंपनीला कुलूप लावून आरोपी पसार झाले होते. यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अशोक अवचार, अंमलदार विठ्ठल मानकापे यांनी कंपनीचा संचालक सय्यद जियाजूर रहेमान व शहर व्यवस्थापक विनोद साळवेला अटक केली होती. माने मात्र पसार होता. उपनिरीक्षक अवचार यांच्या पथकाने मंगळवारी त्याला भूम तालुक्यातून अटक केली.
अशी आहे घोटाळ्याची पार्श्वभूमी-शहरात ३ कोटीपर्यंत गुंतवणूकदार, राज्यभरात ३५ कोटींपर्यंत उलाढाल-देशात ६ हजार २१९ गुंतवणूकदारांकडून ६०० कोटींपेक्षा अधिक रक्कम हडपली-जून २०२४मध्ये फसवणूकप्रकरणी सेबीकडून कंपनीवर बंदी-जुलै २०२४मध्ये भुवनेश्वर पोलिसांकडून अटक, तर मार्च २०२५मध्ये शहर पोलिसांकडून सय्यद जियाजूर रहेमानला ताब्यात घेतले.
माने, साळवेला विशेष टक्केवारीप्रत्येक गुंतवणुकीवर मानेसह साळवेला पगाराव्यतिरीक्त विशेष टक्केवारी मिळत होती. बी. एस्सी., एमबीए (फायनान्स) ची पदवी असलेला माने २०१७ पासून कंपनीत कामाला होता. काही वर्षांपूर्वी त्याला महाराष्ट्र हेड बनवण्यात आले. शहर आर्थिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्यात १,६४५ पानांचे दोषाराेपपत्र सादर करण्यात आले आहे.
देशभरात ११८ बँक खाती, ६३ मालमत्ता जप्तआत्तापर्यंत कंपनीवर ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, महाराष्ट्र, झारखंड, गुजरातमध्ये गुन्हे दाखल आहेत. ईडीकडून याचा समांतर तपास सुरू असून, २४ मे रोजी त्यांनी संचालक दिलीप कुमार मैती व अनारुल हुसैनी यांना अटक केली. आत्तापर्यंत त्यांनी संचालकांची ११८ बँक खाती, ६३ मालमत्ता जप्त करण्यात यश मिळवले. ज्यात हॉटेल, रिसॉर्ट, जमीन, बंगला, फ्लॅटसह दुबईतील इमारत जप्त करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांनी तक्रारीसाठी समोर यावे, असे आवाहन उपनिरीक्षक अशोक अवचार यांनी केले आहे.