महाबीजला मंचाचा ‘झटका’
By Admin | Updated: July 9, 2014 00:28 IST2014-07-09T00:05:26+5:302014-07-09T00:28:22+5:30
लोहारा : महाबीजचे तुरीचे बियाणे सदोष निघाल्याप्रकरणी लोहारा तालुक्यातील शेतकऱ्याने लातूर येथील जिल्हा ग्राहक मंचामध्ये तक्रार दाखल केली होती.

महाबीजला मंचाचा ‘झटका’
लोहारा : महाबीजचे तुरीचे बियाणे सदोष निघाल्याप्रकरणी लोहारा तालुक्यातील शेतकऱ्याने लातूर येथील जिल्हा ग्राहक मंचामध्ये तक्रार दाखल केली होती. त्यावर मंचाने शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय दिला होता. परंतु, महाबीजने या निर्णयाविरूद्ध औरंगाबाद विभागीय मंचाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, येथेही महाबीजच्या खात्यात निराशाच पडली. लातूर ग्राहक मंचाचा निकाल कायम ठेवत शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
भातागळी येथील शेतकरी अमोल बस्वणप्पा ओंबाडकर यांनी १० जून २००७ रोजी लातूर येथील अंबिका फर्र्टिलायझर्स यांच्याकडून महाबीज अकोला यांचे तुरीचे बियाणे खरेदी केले होते. जवळपास तीन बॅग बियाण्याची दोन हेक्टरवर पेरणी केली होती. दरम्यानच्या काळात बियाण्याची उगवणही चांगली झाली. पीकही जोमदार आले. चांगली प्रकारे फुलेही लागली होती. मात्र, ती लाल आणि पिवळ्या रंगाची होती. त्यामुळे सदरील बियाणे सदोष असल्याची तक्रार जिल्हा बियाणे तक्रार चौकशी समितीकडे केली. त्यानुसार समितीच्या सदस्यांनी १७ नोव्हेंबर २००७ रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे सांगून १ डिसेंबर रोजी तुरीच्या पिकाची पाहणी करण्यासाठी बोलावण्यात आले होते. परंतु, महाबीज आणि अंबिका फर्टिलायझर्सचे कोणीही हजर राहिले नाही. यावेळी पाहणीमध्ये तुरीचे बियाणे सदोष असल्याचे आढळून आले. त्यानुसार अहवालही सादर करण्यात आला. तुरीच्या काढणीनंतर पिकाचा पंचनामा करण्यात आला. निघालेल्या तुरीचे वजन ११ क्विंटल २५ किलो इतके भरले. शेतकरी ओंबाडकर यांची जमीन चांगल्या प्रतीची असल्यामुळे त्यांना प्रतिकिलो ४ क्विंटल २ किलो असा उतारा मिळणे आवश्यक होते. मात्र त्यांना साडेचौदा क्विंटल कमी उत्पन्न मिळाले. याप्रकरणी त्यांनी लातूर येथील ग्राहकमंचाकडे तक्रार नोंदविली होती. मंचासमोर आलेले साक्षी पुरावे लक्षात घेऊन ग्राहक मंचाने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला. नुकसान भरपाईपोटी २० हजार रुपये ९ टक्के व्याजदराने तीस दिवसाच्या आत देण्याचे आदेश दिले होते. तसेच मानसिक त्रासापोटी दोन हजार रुपये, तक्रारी अर्जाचा खर्च एक हजार रुपये असे तीन हजार रुपये देण्याबाबतही आदेशात नमूद केले होते. या निर्णयाविरुद्ध महाबीज अकोला यांनी विभागीय ग्राहक मंच औरंगाबाद यांच्याकडे अपील केले. मात्र याही कार्यालयाने लातूर ग्राहक मंचाचाच निर्णय जैसे थे ठेवला आहे. त्यामुळे महाबीजसाठी हा एक प्रकारचा झटका मानला जात असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जवळपास ७ वर्षानंतर संबंधित शेतकऱ्याला न्याय मिळाला आहे. (वार्ताहर)