एकाच महिन्यात १० लाखांचे नुकसान
By Admin | Updated: July 3, 2014 00:15 IST2014-07-03T00:11:43+5:302014-07-03T00:15:30+5:30
विजय चोरडिया , जिंतूर आगारात दोन महिन्यांपासून व्यवस्थापनाच्या मनमानीमुळे एकाच महिन्यात दहा लाखांचे नुकसान झाले असून, तब्बल १२ गाड्या, २५ वाहक-चालक आगारामध्ये बसून आहेत़

एकाच महिन्यात १० लाखांचे नुकसान
विजय चोरडिया , जिंतूर
आगारात दोन महिन्यांपासून व्यवस्थापनाच्या मनमानीमुळे एकाच महिन्यात दहा लाखांचे नुकसान झाले असून, तब्बल १२ गाड्या, २५ वाहक-चालक आगारामध्ये बसून आहेत़ व्यवस्थापनाने फारसे लक्ष न दिल्याने जिंतूरचे आगार आता डबघाईला आले आहे़
राज्य पातळीवर पाच वर्षापूर्वी जिंतूर आगार प्रथम आले होते़ त्यावेळीही रस्त्यांची अवस्था फारशी चांगली नव्हती़ परंतु, आहे त्या परिस्थितीत उत्पन्नाचा विचार करून फेऱ्यांची संख्या व वेळापत्रक पाळले जात होते़ पाच वर्षाच्या कालावधीत ग्रामीण भागातील बहुतांश रस्ते दुरुस्त करण्यात आले़ किंबहुना पहिल्यापेक्षा रस्त्यांची अवस्था, गाड्यांची अवस्था चांगली असतानाही उत्पन्नात मात्र जिंतूर आगार राज्यस्तरावर खालच्या पातळीवर पोहचला आहे़
या सर्व प्रकाराला आगारातील व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांत समन्वयाचा अभाव, गाड्यांची नादुरुस्ती, गाड्यांना उपलब्ध नसलेले सुटे भाग व जिल्हास्तरावरील व्यवस्थापनाची दुजाभावाची वागणूक यामुळे जिंतूर आगार आता डबघाईला आले आहे़ जिंतूर आगारात सध्या ५८ गाड्या उपलब्ध आहेत़ यापैकी पाच गाड्या मानव विकासच्या असून ५३ पैकी १२ गाड्या नादुरुस्त आहेत़ त्यामुळे १२ चालक व १२ वाहक ड्युटी नसल्याने आगारामध्ये बसून आहेत़ जून महिन्यामध्ये तब्बल ३६ हजार ३२७ किमी विविध कारणांनी कमी झाले़ म्हणजेच आगाराचे ९ लाख ८१ हजार ९१८ रुपयांचे नुकसान झाले़
मागील वर्षी पंढरपूर यात्रेनिमित्त ४३ गाड्या सोडण्यात आल्या़ ८६ फेऱ्या करून २९ हजार ३४ किमी प्रवासातून ७३ हजार २५२ रुपयांचे उत्पन्न आगाराला प्राप्त झाले़ यावर्षी आगारात गाड्याच उपलब्ध नाहीत़ त्यामुळे आता यात्रेनिमित्त आगार काय करेल हे सांगता येत नाही़ ४ ते १३ जुलै दरम्यान जिंतूर आगारातून पंढरपूरसाठी विशेष गाड्या सोडाव्या लागणार आहेत़
विशेष म्हणजे लोकमत प्रतिनिधीने जिंतूर आगाराला भेट दिल्यानंतर आगार प्रमुख, स्थानक प्रमुख, स्थानक नियंत्रक कोणीही हजर नव्हते़ सर्व कारभार अलबेल अवस्थेत होता़ त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मात्र याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला़
ग्रामीण भागातील फेऱ्या होणार बंद
आषाढी यात्रेला गाड्या पाठविण्यासाठी जिंतूर आगारात पुरेशी व्यवस्था नाही़ त्यामुळे ग्रामीण भागातील किमान ८६ फेऱ्या बंद कराव्या लागणार आहेत़ त्यामुळे या भागातील प्रवाशांना किमान १० दिवस एसटी शिवाय प्रवास करावा लागेल़
जिंतूर आगारातील एमएच १४ बीटी १९५०, एमएच २० डी-९६३६, एमएच २० डी-९८४५, एमएच २० सीएल-०६११, एमएच १४ बीटी ००१८, एमएच २०डी-९८४४, एमएच २० डी- ९६१४, एमएच २० बीएल-२४६, एमएच ०६- ८६४३, एमएच २० बीएल- ६११, एमएच १४ बीटी-००९९ या गाड्या दुरुस्ती अभावी जिंतूर आगारात पडून आहेत़