मतदान नोंदणी कार्यक्रमाला तहसील कार्यालयाचाच खो

By Admin | Updated: June 1, 2014 00:24 IST2014-06-01T00:08:30+5:302014-06-01T00:24:57+5:30

जिंतूर: संपूर्ण राज्यात मतदान नोंदणी अभियान सुरु झालेले असताना जिंतूर तहसील कार्यालयात मात्र अधिकारी व कर्मचार्‍यांना या अभियानाचा थांगपत्ताच नाही.

Losing the tehsil office to voting registration program | मतदान नोंदणी कार्यक्रमाला तहसील कार्यालयाचाच खो

मतदान नोंदणी कार्यक्रमाला तहसील कार्यालयाचाच खो

जिंतूर: संपूर्ण राज्यात मतदान नोंदणी अभियान सुरु झालेले असताना जिंतूर तहसील कार्यालयात मात्र अधिकारी व कर्मचार्‍यांना या अभियानाचा थांगपत्ताच नाही. नव्हे, तर पदवीधर नोंदणी यादीतही मोठा घोळ असून अनेकांची नावे यादीत न आल्याने तहसील कार्यालयाचा भोंगळ कारभार उघडा पडला आहे. जिंतूर तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांत समन्वयाचा अभाव दिसून येतो. राज्यभरामध्ये नवीन मतदार नोंदणी अभियान सुरु झाले आहे. या अभियानांतर्गत नवीन मतदार नोंदणी, मतदारयादीतील नाव कमी करण्यासाठी किंवा वगळण्यासाठी आक्षेप, नावातील दुरुस्ती आदी कारणांसाठी राज्य निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला. लोकसभा निवडणुकीत अनेकांची नावे यादीतून गायब झाली होती. मतदान केंद्रावर पोहोचल्यावर यादीत नावे नाहीत, याची माहिती मतदारांना मिळाल्याने त्यावेळी एकच गोंधळ उडाला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत असे प्रकार होऊ नयेत. ज्यांची नावे यादीत नाहीत, अशांनी खात्री करुन यादीमध्ये नावे समाविष्ट करावीत, यासाठी आयोगाने राज्यभर मतदार नोंदणी अभियान सुरु केले आहे. विविध वर्तमानपत्रात या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरही जिंतूर तहसील कार्यालयातील निवडणूक विभाग मात्र गाढ झोपेत असल्याचे दिसते. या संदर्भात निवडणूक विभागाशी संपर्क साधला असता मतदार नोंदणी कार्यक्रमाची माहिती या विभागाकडे नव्हती. विशेष म्हणजे, जिंतूर येथील तहसीलदार मंजुषा लटपटे या मागील दहा ते बारा दिवसांपासून रजेवर आहेत. परिणामी अधिकारी नसल्यानेही फारसे गांभीर्याने शासनाचे कार्यक्रम राबविले जात नसल्याचे दिसून येत आहे. नायब तहसीलदार बोरगावकर यांच्याकडे तात्पुरत्या स्वरुपात तहसील कार्यालयाचा कारभार आहे. सर्वसाधारण निवडणुकीबरोबरच पदवीधर मतदारसंघाचे मतदान २० जून रोजी होणार आहे. या निवणुकीसाठी मतदार नोंदणी ३० मेपर्यंत करणे गरजेचे होते. यासंदर्भात येथील निवडणूक प्रशासनाने कोणतीही प्रसिद्धी केलेली नाही. यामुळे अनेक पदवीधरांना नोंदणी करता आली नाही. शिवाय शेकडो पदवीधरांनी सहा महिन्यांच्या टप्प्यात मतदार नोंदणी अर्ज भरुन दिले होते. परंतु, त्यांची नावे मतदार यादीत आली नाहीत. शिवाय निवडणूक प्रशासनाला किती तारखेपर्यंत मतदार नोंदणी करता येईल, याबाबत संभ्रावस्था आहे. काहींनी चार दिवसांपूर्वीच नोंदणी संपल्याचे सांगितले. तर काहींनी शेवटची तारीख असल्याचे सांगितले. नेमकी तारीख कोणती, याबाबत अधिकार्‍यांतही एक वाक्यता नाही. निवडणूक विभागाच्या या सावळ्या गोंधळाने मात्र पदवीधर व सर्वसाधारण मतदारांना याचा फटका बसत आहे. (वार्ताहर)अवघ्या २० दिवसांवर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येऊन ठेपली असताना अनेक पदवीधरांची नावे मतदारयादीतून गायब झालेली दिसली. नोंदणी करुनही यादीत नावे नसल्याने अनेक पदवीधरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने प्रभागातील गटागटातची नावे गायब झाली होती, तशाच पद्धतीने अनेक पदवीधरांची नावे यादीतून गायब झाल्याचे चित्र दिसत आहे. या सर्व प्रकाराला जिल्हा निवडणूक विभागाबरोबरच तालुका निवडणूक अधिकारीही जबाबदार असल्याचे दिसते.जिंतूर येथील निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार पाईकराव यांना मतदार नोंदणीसंदर्भात माहिती विचारली असता असा कोणताच कार्यक्रम सध्या सुरु नाही. पदवीधर मतदारसंघाची यादी बनविण्याचे काम चालू आहे. नवीन कार्यक्रमाबाबत जिल्हा प्रशासनाने साधा फोनही केला नाही, असा कार्यक्रमच अजून जाहीर झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. यालाच निवडणूक विभागातील अन्य कर्मचार्‍यांनीही दुजोरा दिला. मात्र संबंधित अधिकार्‍यांना मतदार नोंदणी सुरु झाल्याबाबतही वर्तमानपत्रातील जाहिरात दाखविल्यानंतर चमडी बचाव धोरण अवलंबत जिल्हा प्रशासनाकडे बैठकीला जात आहे, तेथून सूचना आल्यानंतर नोंदणी कार्यक्रम सुरु होईल, असे सांगण्यास पाईकराव सांगण्यास विसरले नाहीत.

Web Title: Losing the tehsil office to voting registration program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.