८ महिन्यांत ९ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा
By Admin | Updated: September 15, 2015 00:21 IST2015-09-14T23:41:43+5:302015-09-15T00:21:02+5:30
औसा : गेल्या चार वर्षांपासून निसर्गाचे ऋतुचक्र बदलल्याचा अनुभव शेतकऱ्यांना घ्यावा लागत आहे. परिणामी, शेतीतून उत्पादन काहीच मिळत नाही.

८ महिन्यांत ९ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा
औसा : गेल्या चार वर्षांपासून निसर्गाचे ऋतुचक्र बदलल्याचा अनुभव शेतकऱ्यांना घ्यावा लागत आहे. परिणामी, शेतीतून उत्पादन काहीच मिळत नाही. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढतच आहे. तालुक्यात गेल्या आठ महिन्यांत ९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. २०१४ या वर्षातील शेतकरी आत्महत्येच्या संख्येत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे.
औसा तालुका हा पावसाळी पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे तालुक्यात सिंचनाचे क्षेत्र अत्यल्प आहे. गेल्या चार वर्षांपासून तालुक्यात पर्जन्यमान कमी झाल्याने पाणीपातळी खालावली आहे. ७०० फुटांपेक्षा खोल असलेल्या कुपनलिकाही कोरड्या पडल्या आहेत. हंगामी शेती करणाऱ्यांबरोबरच बागायतदारांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे.
यंदा तर पावसाने गुंगारा दिला आहे. तालुक्यातील सर्व भागांत पाऊस न झाल्याने खरीपाच्या पेरण्या वेळेवर झाल्या नाहीत. त्यामुळे शेतीसाठी काढलेल्या कर्जाचा डोंगर वाढलेलाच आहे. शेतीतून उत्पादन न निघाल्याने हवालदिल झालेल्या तालुक्यातील ९ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्राच संपविली आहे.
जानेवारीत बोेरफळ येथे १, मार्चमध्ये बिरवली आणि सेलू येथे प्रत्येकी १, मे महिन्यात येळी आणि हरेगाव येथे प्रत्येकी १, जुलैमध्ये हासेगाववाडी व वानवडा येथे प्रत्येकी १ तर आॅगस्टमध्ये होळी आणि वानवडा येथे प्रत्येकी एका शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले आहे. आठ महिन्यांत नऊ जणांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. (वार्ताहर)