जिल्ह्यात १५ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:02 IST2020-12-28T04:02:56+5:302020-12-28T04:02:56+5:30
जि. प. कृषी विभाग : खरेदीवेळीच इ पाॅज मशीनवर नोंदणी न करणे भोवले --- औरंगाबाद : जिल्ह्यात खत विक्रीच्या ...

जिल्ह्यात १५ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित
जि. प. कृषी विभाग : खरेदीवेळीच इ पाॅज मशीनवर नोंदणी न करणे भोवले
---
औरंगाबाद : जिल्ह्यात खत विक्रीच्या योग्य नोंदी न ठेवणे, एकाच शेतकऱ्याच्या नावावर जास्त विक्री दाखवल्याची प्रकरणे चौकशीत समोर आल्याने १५ खत विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई कृषी विभागाकडून करण्यात आली. यापुर्वीही २७ खत विक्रेत्यांवर कारवाई केल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांंनी दिली.
सध्या जिल्ह्यात रबीसाठी खताच्या उपलब्धतेसाठी नियोजन सुरु आहे. सर्वाधिक अडचण युरियात येते. या खतावर सर्वाधिक सबसीडी असते. तर खताचे नियोजन करतांना कोणत्या शेतकऱ्याकडे किती क्षेत्र आहे. त्याचा वापर किती आहे, याकडे केंद्र शासन कटाक्षाने लक्ष देत असुन दर पंधरा दिवसांना त्यांचा आढावाही घेत आहे. विक्रेत्यांकडे असलेला भौतीक साठा, विक्रीचे पावती पुस्तक व इ पाॅजवरच्या त्याच वेळी नोंदी केल्या तर मागणी पुरवठ्यातील तफावत लक्षात येते. मात्र, विक्रेत्यांकडून त्याकडे दुर्लक्ष केल्या जाते. तर अनेकदा शेतकरीही त्यासाठी आधार क्रमांक देण्यास टाळाटाळ करतांना दिसुन आले आहे. युरिया खताच्या तुटवड्यावेळी अनेक शेतकऱ्याच्या नावावर खतांची खरेदीची नोंद नव्हती तर एकाच शेतकऱ्याच्या नावावर अधिक नोंदी आढळून आल्या. त्याच्या चौकशी अंती जिल्हात १५ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबीत केल्या गेले.
--
सर्वाधिक सोयगांव तालुक्यात ८ परवाने निलंबीत
--
जिल्ह्यात ११८३ खत विक्रेते आहेत. त्यापैकी सबसिडीचे खत सुमारे ६०० विक्रेते खत विक्री करतात. त्यापैकी सोयगांव तालुक्यात ८, गंगापूर, कन्नड, फुलंब्री तालुक्यात प्रत्येकी एक तर पैठण तालुक्यात ४ अशा १५ जणांवर परवाने निलंबनाची कारवाई केल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी दिली.
---
शेतकऱ्यांनी खरेदीवेळी आधारकार्ड व
ई पाॅजवर नोंद भरण्याकडे लक्ष द्यावे
---
अनेक खतांवर सबसिडी मिळते. त्यामुळे कमी किंमतीत खते शेतकऱ्यांना उपलब्ध होतात. या खतांच्या सबसीडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोबाईल सबसीडी माॅनिटरींगच्या कार्यक्रमाअंतर्गत शेवटच्या टप्प्यात इ पाॅज यंत्र खतविक्रेत्यांकडे देण्यात आले. त्यावर खरेदीवेळीच नोंद घेणे आवश्यक आहे. त्यासाठी हस्ते खरेदी असेल तरीही शेतकऱ्याचा आधार क्रमांक सोबत बाळगून ती नोंद व्यवस्थित करुन घेण्याकडे शेतकऱ्यांनीही लक्ष दिल्यास विक्रेता व शेतकरी दोघांनाही अडचणी येणार नाहीत. असे गंजेवार म्हणाले.