डाव्या कालव्याला पाणी सोडले
By Admin | Updated: May 19, 2014 01:08 IST2014-05-19T00:46:36+5:302014-05-19T01:08:23+5:30
तीर्थपुरी: जायकवाडी पाटबंधारे विभागातर्फे नाथसागरातून पैठण डाव्या कालव्यात ३०० क्युसेक्स पाणी पिण्यासाठी सोडण्यात आले.
डाव्या कालव्याला पाणी सोडले
तीर्थपुरी: जायकवाडी पाटबंधारे विभागातर्फे नाथसागरातून पैठण डाव्या कालव्यात ३०० क्युसेक्स पाणी पिण्यासाठी सोडण्यात आले. ज्या ठिकाणी पाणी साठवन करता येते त्या ठिकाणी पाणी अडवले जाणार असल्याने त्या भागातील विहिरीची पाणी पातळी वाढणार आहे. जायकवाडी पाटबंधारे विभागाने पैठण डाव्या कालव्यात १५ मे रोजी रात्री पाणी सोडले. हे पाणी तीर्थपुरी पर्यंत आले आहे. पैठण, अंबड, घनसावंगी, पाथरी, परतूर, मानवत, परभणी आदी भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली. डाव्या कालव्याच्या पाण्यामुळे परिसरातील विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होणार, तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे. त्यामुळेच परिसरातील शेतकर्यांनी कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली होती. तसेच पालकमंत्री राजेश टोपे यांनी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्याकडे याबाबत मागणी केली होती. ती मान्य करून जायकवाडी पाटबंधारे विभागाला तटकरे यांनी पाणी सोडण्याबाबत सुचना दिली होती. ‘लोकमत’ नेही याबाबत वृत्त प्रकाशित केले होते, त्याची दखल घेवून हे पाणी सोडण्यात आले. प्रत्येक ठिकाणी साठवणार पाणी पैटण डाव्या कालव्यावर ज्या ठिकाणी कॅनल मध्ये ज्या ठिकाणी पाणी साठवता येते अशा डाव्या कालव्यावरील गोपेवाडी, विहामांडवा, वडीगोद्री, तीर्थपुरी, आष्टी दरम्यान पाणी सोडण्यात येणार असून पाणी साठविणार असल्याचे शाखा अभियंता भागवत मापारी यांनी सांगितले. या ठिकाणी अडीच मीटर उंच तर पाच ते सहा किमी लांब असे पाणी साठविले जाणार आहे. त्यामुळे त्या भागातील पाणी पातळीत वाढ होण्यास मदत मिळणार आहे.१२२ किमी पाणी गेल्यास २०० क्युसेक्स पाणी जास्तीचे सोडण्यात येणार आहे. एकूण ५०० क्युसेक्स पाणी अतिरिक्त सोडण्यात येणार आहे. (वार्ताहर)