८५ रुपयांचा एलईडी बल्ब विकला जातोय १०० रुपयाला !
By Admin | Updated: April 20, 2016 23:40 IST2016-04-20T23:16:39+5:302016-04-20T23:40:56+5:30
लातूर : घरगुती प्रकाश कार्यक्रमांतर्गत माफक दरात एलईडी बल्ब देण्याची योजना राज्य व केंद्र शासनामार्फत राबविली जात आहे.

८५ रुपयांचा एलईडी बल्ब विकला जातोय १०० रुपयाला !
लातूर : घरगुती प्रकाश कार्यक्रमांतर्गत माफक दरात एलईडी बल्ब देण्याची योजना राज्य व केंद्र शासनामार्फत राबविली जात आहे. मात्र विक्री केंद्रातून ८५ रुपयांचा बल्ब १०० रुपयाला विकून ग्राहकांची लूट केली जात आहे.
कें द्र शासनाच्या घरगुती कार्यक्षम प्रकाश कार्यक्रमाअंतर्गत ऊर्जेचा कमी वापर व्हावा, यासाठी केंद्र शासनाने एलईडी बल्बचा पुरवठा सुरू केला आहे. त्या बल्बासाठी वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळे दर आहेत. महाराष्ट्रासाठी ८५ रुपयांचा दर आकारण्यात आला आहे. त्यासाठी लातूर जिल्ह्यात ३५ विक्री केंद्र आहेत. या विक्री केंद्रातून हा बल्ब ८५ रुपयांना विकण्याऐवजी १०० रुपयाला विकून ग्राहकांची लूट केली जात आहे.
एलईडीच्या मुळ किंमतीबाबत ग्राहकांना कुठलीही माहिती न देता सर्रासपणे १०० रूपयात बल्ब विक्री करण्याचे काम महावितरणने सुरू केले आहे़ महावितरणकडून ऊर्जेचा कमी वापर करण्यासाठी हा उपक्रम सुरू केल्यामुळे ग्राहकांनी या योजनेला भरभरून प्रतिसाद दिला आहे़ आजतागायत लाखो ग्राहकांनी एलईडी बल्ब खरेदी केले आहेत. परंतु, ग्राहकांना ८५ रूपयांच्या पावत्या देण्याऐवजी शंभर रूपयालाच बल्बची विक्री करून १०० रुपयांचीच पावती दिली जाते.
दरम्यान या कालावधीत या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे़ त्यामुळे या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशा मागणीचे निवेदन छावा संघटनेचे लातूर तालुकाध्यक्ष राहूल मुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे़ त्यामुळे एलईडीची विक्री करणाऱ्या स्टॉलचाकांचे धाबे दणाणले आहेत़ (प्रतिनिधी)
एलईडी बल्बची किंमत मार्केटमध्ये ४०० रुपये आहे. महावितरणच्या विक्री केंद्रात तो शंभर रुपयाला विकला गेला हे खरे आहे. पाडवा झाल्यानंतर आम्ही १०० रुपये ऐवजी ८५ रुपयालाच बल्ब दिलेला आहे. ज्या ग्राहकांनी १०० रुपयाला घेतला असेल आणि त्यांच्याकडे पावती असेल तर उर्वरित १५ रुपये आम्ही परत करू, असे अधीक्षक अभियंता बी.ए. वासनिक म्हणाले.