पोस्टल मतांतही महायुतीला ‘लीड’
By Admin | Updated: May 17, 2014 00:18 IST2014-05-17T00:09:57+5:302014-05-17T00:18:44+5:30
उस्मानाबाद : मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला भक्कम मताधिक्य मिळाले आहे.

पोस्टल मतांतही महायुतीला ‘लीड’
उस्मानाबाद : मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला भक्कम मताधिक्य मिळाले आहे. विशेष म्हणजे, आघाडीची ज्या पोस्टल मतांवर मदार असते, त्यावरही यंदा शिवसेनेनेच डल्ला मारला आहे. तब्बल १३४८ मते खेचण्यात शिवसेनेला यामध्ये यश मिळाले आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रा. रवींद्र गायकवाड यांचा विक्रमी मताधिक्याने विजय झाला आहे. औसा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेला ५४ हजार ५०६ असे घवघवीत मताधिक्य मिळाले आहे तर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री दिलीप सोपल यांच्या बार्शी विधानसभा मतदारसंघानेही सर्वाधिक म्हणजे ५५ हजार मताधिक्य सेनेच्या पारड्यात टाकले आहे. रवींद्र गायकवाड यांचे होमपीच असलेल्या उमरगा विधानसभा मतदारसंघातून सेनेला ३९ हजार ४०३ मतांची आघाडी मिळाली आहे तर पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनीही यावेळी सेनेलाच आपला कौल दिला. येथून गायकवाड यांना ३४ हजार ५८८ मताधिक्य मिळाले आहे. उस्मानाबाद आणि परंडा या दोन मतदारसंघात इतर मतदारसंघांच्या तुलनेत काहीसे कमी मताधिक्य असले तरी परंड्यातून ३० हजार तर उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातूनही गायकवाड यांनाच २० हजार १७१ असे मताधिक्य मिळाले आहे. सर्वत्र एकच ट्रेंड लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीतच सेनेला प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुमारे १२०० ते १६०० असे मताधिक्य होते. मतांचा हा ट्रेंड पुढे निकाल संपेपर्यंत कायम होता. दुपारी चारपर्यंत सर्व निकाल हाती येतील, अशी अपेक्षा असताना तांत्रिक कारणांमुळे निकाल जाहीर होण्यास विलंब झाला.