लातूरची भेंडी जर्मनीच्या बाजारात
By Admin | Updated: December 14, 2015 23:53 IST2015-12-14T23:52:48+5:302015-12-14T23:53:04+5:30
बाळासाहेब जाधव , लातूर लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून अल्प पर्जन्यमान होत असले तरी आहे त्या पाणी स्त्रोतावर जिल्ह्यातील २४ शेतकऱ्यांनी ४२ एकरवर भेंडीची लागवड करुन

लातूरची भेंडी जर्मनीच्या बाजारात
बाळासाहेब जाधव , लातूर
लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून अल्प पर्जन्यमान होत असले तरी आहे त्या पाणी स्त्रोतावर जिल्ह्यातील २४ शेतकऱ्यांनी ४२ एकरवर भेंडीची लागवड करुन त्याची विक्री सुरु केली आहे़ लातूरच्या बाजारपेठेपेक्षा दुपटीने बाजारभाव देणाऱ्या जर्मनीत लातूरची भेंडी विक्रीसाठी जात असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला एकरी निव्वळ खर्च सोडून १ लाख २० हजारांचे उत्पन्न मिळत आहे़ दुष्काळी परिस्थितीतही लातूरच्या शेतकऱ्यांना कमालीचे उत्पन्न मिळत असल्याने त्यांचे कौतुक होत आहे़
लातूर जिल्ह्यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून समाधानकारक पर्जन्यमान होत नसल्याने शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे़ परंतु, लातूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी आहे त्या जलस्त्रोतावर भेंडीची लागवड करुन उत्पन्न घेणे सुरु केले आहे़ यापूर्वी बीड जिल्ह्यातील भावठणा, परळी, नागापूर, पांघरी येथील शेतकऱ्यांनी ३२ टन भेंडी उत्पादन घेऊन जर्मनीला विक्री करुन त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळविले़ त्याच भेंडीच्या लागवडीची पाहणी लातूरच्या २४ शेतकऱ्यांनी केली असून, त्यांनीही त्याच पद्धतीने उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला़ यामध्ये औसा तालुक्यातील ८, निलंगा तालुक्यातील १५ आणि लातूर तालुक्यातील १ अशा एकूण २४ शेतकऱ्यांनी ४२ एकरवर भेंडीची लागवड केली़ त्या भेंडीच्या उत्पादनाचे निरीक्षण फायटोसॅनिटरी निरीक्षक ए़ पी़ पाटील यांनी पाहणी करुन एक्सपोर्टर विजय कावंदे यांना सदरील भेंडी पाठविण्यायोग्य असल्याचे सांगितल्यानंतर लातूर जिल्ह्यातील २४ शेतकऱ्यांचे दीडशे ते दोनशे टन भेंडी जर्मनीला नेण्याचा निर्णय घेतला आहे़ यापूर्वी बीड जिल्ह्यातील चार गावातील शेतकऱ्यांनी उत्पन्न घेतल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला एकरी २० हजाराचा खर्च येणार असून, त्यांना एकरी १ लाख २० हजाराचा निव्वळ खर्च जाता नफा मिळाला आहे़ त्या शेतकऱ्यांच्या वाटचालीवर लातूरच्या २४ शेतकऱ्यांनी ४२ एकरवर भेंडीचे उत्पन्न घेतले आहे़ हे उत्पन्न बाराही महिने घेता येत असल्याने शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीतही दिलासा मिळणार असल्याचा विश्वास कृषी विभागाचे फायटोसॅनिटरी निरीक्षक ए़ पी़ पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला़