लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंडे ‘रस्ता चुकल्या’ !
By Admin | Updated: April 6, 2016 00:21 IST2016-04-06T00:21:45+5:302016-04-06T00:21:45+5:30
दत्ता थोरे , लातूर लातूर आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांचा पाकलमंत्र्यांचा पदभार घेतल्यापासून मोजून हा दहावा दौरा होता.

लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंडे ‘रस्ता चुकल्या’ !
दत्ता थोरे , लातूर
लातूर आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांचा पाकलमंत्र्यांचा पदभार घेतल्यापासून मोजून हा दहावा दौरा होता. त्यात महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या लातूर दौऱ्यात त्या सहभागी झाल्या खऱ्या, पण दौऱ्यातील ठिकाणांना भेटी देताना त्यांचा अचानक ‘रस्ता चुकला’. त्यांच्या या रस्ता चुकल्याची चर्चा चालू असताना एका भाजपच्याच कार्यकर्त्याने, ‘अहो त्या लातूरला आल्या, हेच मुळी रस्ता चुकून’ अशी बोलकी प्रतिक्रिया दिली.
पंकजा मुंडे यांना लातूरच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर खरेतर लातूरकरांमध्ये आनंदाचे भरते आले होते. कारण गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख या दोन्ही दिवंगत नेत्यांमध्ये असलेल्या मैत्रीच्या नात्याचा नेहमीच लातूरला फायदा झाला. तसा दुसऱ्या पिढीतील पंकजा मुंडे या लातूरवर तसेच प्रेम दाखवितील, अशा आशा होत्या. परंतु हा लातूरकरांचा विश्वास फोल ठरला. पालकमंत्री पद मिळाल्यापासून पंकजा मुंडे या केवळ दहा वेळाच लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या आहेत. त्यात एक प्रजासत्ताक दिन, एक हॉस्पिटल उद्घाटन, एक महाराष्ट्र दिन, एक पन्नगेश्वर कारखाना सर्वसाधारण सभा, आणि त्यानंतर तीन वेळा मुख्यमंत्री दौरे आणि एक वेळा महसूल मंत्र्यांसोबतच्या दौऱ्यात दौरे तर एक लग्नासाठीची उपस्थिती असे त्यांच्या दौऱ्याचे विवरण. त्यामुळे आजचा अचानक झालेला त्यांचा दौराही लातूरकरांसाठी चर्चेचा विषय ठरला होता. त्यात महसूलमंत्र्यांचा ताफा रेल्वे स्टेशनला पोहोचला तेव्हा त्यांचा ताफा चक्क हरंगुळच्या जलशुध्दीकरण केंद्राजवळ पोहोचला होता. तिथे थांबून त्या महसूलमंत्र्यांच्या ताफा येण्याची प्रतीक्षा करीत होत्या. तिथे त्यांना कळले की महसूलमंत्री रेल्वे स्थानकाकडे गेले आहेत तेव्हा त्यांनी आपला मोर्चाही तिकडेच वळविला. पुढे दोघांचा संयुक्त ताफा विमानतळाकडे वळला. तिथे पत्रकार परिषदेत त्यांनी शब्दही काढला नाही.
विमानतळावर झालेल्या पत्रपरिषदेत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शब्दही काढला नाही़ पत्रकारांनी पाणीप्रश्नावर छेडले असता त्या म्हणाल्या की, पाणी संपल्यावर येण्यात काय अर्थ होता ? मी तर पाणी घेऊन आले आहे, असे उत्तर दिले. लातूर जिल्ह्यातील बहुतांश गावात टंचाईच्या झळा सुरू आहेत़