बहुविकलांग मुलांसाठी लातुरच्या पाटील दाम्पत्याची ‘प्रकाशवाट’ !
By Admin | Updated: December 3, 2014 01:16 IST2014-12-03T01:08:06+5:302014-12-03T01:16:28+5:30
पंकज जैस्वाल/भालचंद्र येडवे ,लातूर दिलीप प्रभावळकरांचा ‘चौकट राजा’ चित्रपट आठवतो ? अथवा ‘आम्ही असू लाडके’ तरी ? नाही... जाऊद्या... अगदी अलिकडचा अमिताभ-राणी मुखर्जीचा ‘

बहुविकलांग मुलांसाठी लातुरच्या पाटील दाम्पत्याची ‘प्रकाशवाट’ !
पंकज जैस्वाल/भालचंद्र येडवे ,लातूर
दिलीप प्रभावळकरांचा ‘चौकट राजा’ चित्रपट आठवतो ? अथवा ‘आम्ही असू लाडके’ तरी ? नाही... जाऊद्या... अगदी अलिकडचा अमिताभ-राणी मुखर्जीचा ‘ब्लॅक’ किंवा डाऊन सिंड्रोमवरचा ‘यलो’ किंवा रणबिर कपूर व प्रियांका चोप्राचा ‘बर्फी’ तरी हमखास आठवत असेल.. अगदी तशाच ‘सेम टू सेम’ स्टोरीज्चे आयुष्य दररोज जगणाऱ्या ४७ मुलांची खरेखुरी ‘संवेदना’ अनुभवणारे व तिच्यावर फुंकर मारणारे एक ‘जनकल्याण’चे जोडपे लातुरात राहतेय.
दीपा आणि सुरेश पाटील हे या दाम्पत्याचे नाव. स्वत:ला बहुविकलांग मूल झाले आणि त्याला वाढविताना अज्ञानाअभावी कष्ट पडले. त्याला शिकायला अख्ख्या लातूर जिल्ह्यात शाळाच नाही, हे कळल्यावर मोठा धक्का बसला. अन् कासारशिरसीतील चालते मेडीकल बंद करून कोणतेही अनुदान नसताना निव्वळ देणग्यांवर एक दाम्पत्य आज गेल्या आठ वर्षांपासून बहुविकलांग मुलांची शाळा चालविते आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रचारक म्हणून पूर्णवेळ काम केल्यावर सुरेश पाटील हे कासारशिरसी (ता. निलंगा, जि. लातूर) येथे स्वत:चे मेडिकल दुकान चालवित होते. नाशिकच्या वनवासी आश्रमात एक वर्षे पूर्ण वेळ कार्यकर्ती असलेल्या दिपातार्इंशी त्यांचा विवाह झाला. सामाजिक कामाची दोघांनाही असणारी आवड हाच यांच्या विवाहाचा धागा. विवाहानंतर या दाम्पत्याला मुलगा झाला. जनक राजाच्या मिथिल नगरीवरून त्यांनी नाव ठेवले मिथिलेश. पण मिथिलेश आठ महिन्याचा असेपर्यंत चिडायचा, रडायचा. वयोमानाप्रमाणे मूल जसे पालथे पडते, रांगते तसे ते रांगत नाही, हे त्यांच्या लक्षात आले. पण तो कसा आहे, त्याला काय होतय हे कळायचे नाही. अनेक डॉक्टरांना नेमके निदान कळायचेही नाही. पण तो आठ महिन्याचा असताना मुंबईच्या जे.जे. आणि केईएम मध्ये एकदाचा उलगडा झाला. मुलाला घडविण्यासाठी जनकल्याण समितीच्या एका निवासी शाळेतच त्यांनी हा प्रयोग सुरू केला. पण शिक्षक..? त्यासाठी आवश्यक असणारे स्वतंत्र बी.एड. कुणाकडे होते? तेव्हा पतीच्या दोन पावले पुढे होत दीपाताई पाटील यांनी खास बहुविकलांग मुलांसाठी मुंबईच्या स्पास्टिक सोसायटी आॅफ इंडियात मिथू अत्तूर यांनी सुरू केलेल्या संस्थेतून बीएडचे शिक्षण घेतले. लातुरच्या औद्योगिक वसाहतीत विवेकानंद रुग्णालयाचे दोन हॉल आहेत. तिथे शाळा सुरू झाली. एकेक करीत आता ४७ मुले या शाळेत शिकताहेत. सहाव्या वेतन आयोगाच्या जमान्यात निव्वळ पोट भरेल एवढ्या मानधनावर लातुरसारख्या गावात समाजसेवेचा हा दीप भामरागडच्या माळावर आमटे दाम्पत्याने लावलेल्या ‘प्रकाशवाटा’ सारखाच आहे.
काय आहे ‘सेरेब्रल पाल्सी’?
‘सेरेब्रल पाल्सी’ हे बहुविकलांग मुलांसाठीचे इंग्रजी नाव. याला मेंदूचा पक्षघात असे म्हणतात. शासन दप्तरी या आजाराला ‘मतीमंद’ याच ग्रेडमध्ये मोजले जात असले तरी ही मुले मतीमंद नसतात. ती बहुविकलांग असतात. ४
त्यांच्या शरीरातील मांसल भागही हाडासारखा टणक होतो त्यामुळे अवयव टणक होतात. अशा मुलांचा बुध्यांक कमी असतो. पण मतीमंद मुलांपेक्षा चांगला असतो. नियमित व्यायमाने शरीरातील टणकपणा घालविता येतो. आणि बुध्यांक चांगला असल्यास ती स्वत:च्या पायावर उभीही राहू शकतात. ती होण्याची कारणे अनेक असली तरी गर्भात असताना बाळाला आॅक्सिजनची कमी अथवा आईला झालेली इजा, मानसिक ताणतणाव या कारणांची शक्यता असते. अशा आजाराच्या बहुतांश मुलांना आयुष्यभर केअर टेकरची आवश्यकता असते. पण बुध्यांक चांगला असेल तर प्रयत्नाने ती विकसित होऊ शकतात. ४
मिथिलेशला जन्मताच ‘सेरेब्रल पाल्सी’ हा आजार असून तो बहुविकलांग आहे.यामुळे ‘नॉर्मल’ मुलासारखा वाढू आणि जगू शकत नाही, याची जाणीव या दाम्पत्याला झाली. परंतु तो किमान चांगला वाढवा, चांगल्या शाळेत शिकावा असे आई-बाबा म्हणून त्यांना वाटत होते. त्यासाठी गावातून लातूरला शाळा शोधायला म्हणून आले. पण ‘सेरेब्रल पाल्सी’ च्या मुलांसाठी जिल्ह्यातच शाळा नाही, हे त्यांना समजले मग या जिद्दी दाम्पत्याने अशा मुलांसाठी शाळा काढली. फार्मासिस्ट झाल्यावर गावात हौसेने टाकलेल्या मेडकीलला कायमचे कुलूप लावून अनेक मुलांच्या भावनिक कोंडीची चावी घेऊन ते लातुरात विसावले.