जलसाठ्यांना प्रतीक्षा मोठ्या पावसाची
By Admin | Updated: August 18, 2015 00:50 IST2015-08-18T00:16:38+5:302015-08-18T00:50:45+5:30
जालना : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस झाला तरी जलसाठ्यांसाठी हा पाऊस पुरेसा नाही. १३ आॅगट अखेर एक मध्यम तर १३ लघु प्रकल्प कोरडेठाक आहेत.

जलसाठ्यांना प्रतीक्षा मोठ्या पावसाची
जालना : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस झाला तरी जलसाठ्यांसाठी हा पाऊस पुरेसा नाही. १३ आॅगट अखेर एक मध्यम तर १३ लघु प्रकल्प कोरडेठाक आहेत. दोन्ही प्रकल्प मिळून फक्त ५ टक्के पाणीसाठा असल्याचे लघु पाटबंधारे विभागाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होते.
पावसाने दडी मारल्याने विहिरी, कूपनलिकांसोबतच अनेक गावांची तहान भागविणारे तलाव कोरडेठाक आहेत. तर काहींमध्ये अत्यल्प पाणी आहे. आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आत्तापासूनच दिसत आहेत. आज अनेक गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती तीव्र होत आहे. सात मध्यम प्रकल्पांपैकी कल्याण गिरजा प्रकल्पात ४८ टक्के जलसाठा आहे. कल्याण मध्यम प्रकल्पातील साठा जोत्याच्या पातळीखाली आहे. अप्पर दुधना प्रकल्प जोत्याखाली, भोकरदन तालुक्यासाठी वरदान असलेला जुई मध्यम प्रकल्पात ११ टक्के साठा आहे. तर धामणा मध्यम प्रकल्पात गत आठवड्यांच्या पावसाने पाच टक्के साठा झाला. गत आठवड्यात हा प्रकल्प जोत्याखाली होता. जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा प्रकल्पात २५ टक्के पाणीसाठा झाला . गत आठवड्यात फक्त १.४० टक्के पाणी होते.गल्हाटी मध्यम प्रकल्प अद्यापही कोरडाच आहे.
मध्यमसोबतच लघु प्रकल्पही ग्रामीण भागासाठी महत्वपूर्ण आहेत. ५७ पैकी १२ कोरडे तर ३३ प्रकल्प जोत्याच्या खाली आहेत. गत आठवड्यात झालेल्या पावसामुळे काहीअंशी साठ्यात वाढ झाली आहे.
जालना शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयातील पाणी पातळी वाढ झालेली नाही. परिणामी आगामी काळात जालनावासीयांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची भीती आहे. हे जलाशय भरण्यासाठी जोरदार पावसाची आवश्यकता आहे. इतर मध्यम प्रकल्पातही जलसाठ्याअभावी पशुधनाचे हाल होत आहे.