गल्लीबरोबरच दिल्लीकडेही लक्ष..!

By Admin | Updated: May 16, 2014 00:16 IST2014-05-15T23:20:49+5:302014-05-16T00:16:16+5:30

पंकज कुलकर्णी , जालना जालना शहरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचे गल्लीतून दिल्लीकडेच लक्ष असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

Lakshya along with the alley ..! | गल्लीबरोबरच दिल्लीकडेही लक्ष..!

गल्लीबरोबरच दिल्लीकडेही लक्ष..!

पंकज कुलकर्णी , जालना जालना शहरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचे गल्लीतून दिल्लीकडेच लक्ष असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून १६ व्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होणार आहे. त्यामुळे जसजसे निकालाचे चित्र समोर येत जाईल, तसतसे दिल्लीच्या तख्तावर कोण विराजमान होईल, हे स्पष्ट होणार आहे. सुरूवातीपासूनच या निवडणुकीबाबत कमालीची उत्सुकता होती. सोशल नेटवर्किंगसह सर्वांच्याच हातात असलेल्या स्मार्टफोननेही त्यात भर टाकली. प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच निवडणुकांविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला, पाठोपाठ प्रचाराची रणधुमाळी उडाली. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. जालना व परभणी लोकसभा मतदारसंघात १७ व २४ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यंदा मतदानाची टक्केवारीही मोठ्या प्रमाणात वाढली. वाढीव टक्का कोणाच्या पथ्यावर पडेल याविषयी मतदानाच्या दुसर्‍या दिवशीपासूनच चर्चा सुरू झाली होती. मतदान झाले. मतदानानंतर परभणी लोकसभेच्या निकालंसाठी महिनाभराची तर जालनेकरांना तब्बल २२ दिवसांची प्रतीक्षा करावी लागली. या दरम्यान उमेदवार आकडेमोडीत रमले. शहरातील चौका-चौकात तर ग्रामीण भागातील पारा-पारावर निवडणुकीच्याच गप्पा रंगत होत्या. या गप्पांमधून स्थानिक उमेदवारापेक्षा दिल्लीच्या आकडेवारीवरच सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले होते. गल्लीतही दिल्लीच्या गप्पा व राजकीय समिकरणे कशी होतील, राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, केंद्रात नंतरच्या टप्प्यात झालेल्या आकडेवारीवरून तेथील जागांचा अंदाज बांधण्यात येत होता. त्यातच दोन-तीन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या ‘एक्झीट पोल’मुळे तर या चर्चांना अधिकच रंगत आली. प्रतिस्पर्धी उमेदवारांचे कार्यकर्ते छातीठोकपणे आपलाच उमेदवार निवडून येईल, यांचेच सरकार येईल, असे दावे-प्रतिदावे करत होते. ग्रामीण भागातील पारापासून ते शहरातील चौका व व्यापार्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैजाही लावल्या गेल्या आहेत. यातून कोट्यावधी रूपयांची देवाण-घेवाण होणार असल्याची चर्चा बाजारपेठेत ऐकावयास मिळत आहे. एकूणच लोकसभा निवडणुकीविषयी गाव, वस्ती, वाडी-तांड्यावरील मंडळीही थेट दिल्लीच्या सत्तेवर चर्चा करत आहे. ‘गुड फ्रायडे’ कुणासाठी? १६ मे लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. सकाळी ८ वाजेपासूनच शहरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक टीव्हीसमोर ठाण मांडून बसणार हे निश्चित. योगायोगाने या दिवशी शुक्रवार असल्यामुळे हा ‘फ्रायडे’ नेमका कोणासाठी ‘गुड’ ठरणार हे आता काही तासातच कळणार आहे. निवडणूक निकालांविषयी तरुणांसह आबालवृद्धांमध्ये मोठी उत्सुकता पहावयास मिळत आहे.

Web Title: Lakshya along with the alley ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.