कृषी विभागात लाखो रुपयांचा घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:22 IST2017-08-10T00:22:03+5:302017-08-10T00:22:03+5:30
राज्याच्या कृषी विभागाच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

कृषी विभागात लाखो रुपयांचा घोटाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्याच्या कृषी विभागाच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आत्मा संस्थेचे प्रकल्प संचालक आणि कृषी अधीक्षक यांच्या बनावट सह्या करून हा घोटाळा करण्यात आला. ६६ लाख १९ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी उस्मानपुरा पोलिसांनी वरिष्ठ लिपिक तथा रोखापालास मंगळवारी रात्री एका रुग्णालयातून अटक केली. दरम्यान आरोपीला १४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घोटाळ्यात कृषी विभागातील व बँकेतील वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
सुनील गहेनाजी जाधव (सुरेवाडी) असे अटक केलेल्या लिपिकाचे नाव आहे. उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश टाक म्हणाले की, शासनाकडून शेतकºयांसाठी विविध योजना कृषी अधीक्षक कार्यालय आणि प्रकल्प संचालक आत्मा या दोन कार्यालयांमार्फत राबविण्यात येतात. शहानूरवाडी रोडवर ही दोन्ही कार्यालये आहेत. जून २०१२ ते जून २०१७ या कालावधीत आरोपी जाधव हा लेखापाल, लिपिकपदी कार्यरत होता. नोव्हेंबर २०१६ मध्ये आरोपीची बदली झाली. त्याच्या जागेवर रुजू झालेले वरिष्ठ लिपिक के.जी. पाटील यांनी वारंवार मागणी करूनही आरोपीने त्यांना दोन बँक अकाऊं टची माहिती, पासबुक, कॅशबुक, चेकबुक, व्हाऊचर फाइल दिली नाही. त्यामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वी बँकेकडून दोन्ही खात्याच्या स्टेटमेंटची माहिती घेतली. बँकेकडून मिळालेल्या स्टेटमेंटमध्ये आरोपीने एका खात्यात बेकायदेशीर दहा लाख रुपये जमा केल्याचे आढळले. ही रक्कम कशाची आहे, याबाबतचे कोणतेही स्पष्टीकरण त्याने कार्यालय प्रमुखांकडे दिले नाही. त्यांनी ही बाब नव्याने रुजू झालेले प्रकल्प संचालक आणि कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांना कळविली. २००८-९ पासून ते कालपर्यंत झालेल्या खर्चाचे लेखा परीक्षण करण्यासाठी एक पथक पाठविले. पासबुकवरील नोंदी पाहून जाधवने दोन्ही वेगवेगळ्या खात्यात ६६ लाख १९ हजार रुपयांचा अपहार केल्याची तक्रार रेणापूरकर यांनी मंगळवारी रात्री नोंदविली.