जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, पिकांचे नुकसान
By Admin | Updated: March 2, 2015 00:52 IST2015-03-02T00:49:41+5:302015-03-02T00:52:16+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री व रविवारी दिवसभर जिल्ह्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली़ या आस्मानी संकटामुळे रबीतील गहू,

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, पिकांचे नुकसान
उस्मानाबाद : जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री व रविवारी दिवसभर जिल्ह्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली़ या आस्मानी संकटामुळे रबीतील गहू, ज्वारी, हरभरा या पिकाचे मोठे नुकसान झाले असून, द्राक्षासह आंब्याच्या पिकालाही मोठा फटका बसला आहे़
जिल्ह्यात मागील आठवड्यापासून पहाटे थंडी आणि दिवसभरातील तीव्र उन अशा वातावरणामुळे अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात होती़ जिल्ह्यात सर्वदूर शनिवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरणाची निर्मिती होवून पावसाला सुरूवात झाली़ मध्यरात्रीच्या सुमारास जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला़ या पावसाचा उस्मानाबाद तालुका व परिसर, तामलवाडी, काक्रंबा, भूम, वाशी, कळंब, ईट, उमरगा तालुका व परिसरात मोठा जोर होता़ शिवाय परंडा, लोहारा परिसरातही पावसाने हजेरी लावली़ तर रविवारी सायंकाळी भूम तालुक्यातील भूम, ईट, उमरगा शहर व परिसर, वाशी, पारगाव, परंडा, इटकूर, तामलवाडी, काक्रंबा, लोहारा परिसरात पुन्हा पाऊस झाला़ या पावसामुळे काढणीस आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा या पिकासह द्राक्ष, आंब्यासह इतर फळबागांचे नुकसान झाले़ तामलवाडी व परिसरातील जवळपास २२ गावातील द्राक्षबागांचे अतोनात नुकसान या पावसामुळे झाले आहे़ तसेच अनेकांनी शेतात काढून ठेवलेली ज्वारी, गहू, हरभरा ही पिके भिजली असून, ज्वारी काळी पडण्याची भिती शेतकरी वर्तवित आहे़ एकूणच सतत अडचणींच्या फेऱ्यात सापडणाऱ्या शेतकऱ्यांसमोर या आस्मानी संकटामुळे मोठे संकट उभा राहिले असून, प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे़