अवकाळी पावसामुळे फळबागांचे नुकसान

By Admin | Updated: April 13, 2015 00:48 IST2015-04-13T00:41:36+5:302015-04-13T00:48:58+5:30

लातूर : अवकाळी पावसामुळे लातूर जिल्ह्यातील फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे आंबे झडले असून, द्राक्ष व केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत

Lack of Horticulture due to incessant rain | अवकाळी पावसामुळे फळबागांचे नुकसान

अवकाळी पावसामुळे फळबागांचे नुकसान


लातूर : अवकाळी पावसामुळे लातूर जिल्ह्यातील फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे आंबे झडले असून, द्राक्ष व केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. महसूल प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
बुधवारपासून गेली चार दिवस लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. निलंगा, औसा, देवणी, लातूर, चाकूर तालुक्यांत पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. किल्लारी परिसरात द्राक्ष, डाळिंब, केळीच्या बागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच शेतामध्ये उभ्या असलेल्या ज्वारीच्या पिकालाही फटका बसला आहे. महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
सततचा दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष्य अशी परिस्थिती असतानाही किल्लारी परिसरातील बागायतदारांनी द्राक्षबागा जोपासल्या. प्रसंगी शेतामध्ये विंधन विहिरी घेतल्या.
शेततळी निर्माण केली. परंतु, अवकाळीने त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणेचे संचालक राजेंद्र गुंडाप्पा बिराजदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
किल्लारी परिसर द्राक्ष बागांसाठी राज्यात प्रसिद्ध आहे. येथील द्राक्ष इंग्लंड, आफ्रिका, युरोपीयन देशांत निर्यात होतात. गेल्या काही वर्षांपासून पाण्याचे संकट निर्माण झाल्यामुळे ५० टक्के बागा मोडीत काढल्या आहेत. उर्वरित ५० टक्के बागांमधील द्राक्षांचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, अशी माहिती विश्वजित निळकंठ पाटील यांनी दिली. अवकाळी पावसामुळे आंब्याच्या कैऱ्या झडल्या असून, फळबागांचे मोठे नुकसान झाल्याचे विजय माधव भोसले यांनी सांगितले. कलमी आंबे, डाळिंब, द्राक्षांचेही मोठे नुकसान झाल्याचे मत सिरसलचे माधव धानुरे, विनायक कुमठे, सीताराम जाधव, अनिल चेळकर यांनी व्यक्त केले. चाकूर व चापोली परिसरातही फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अहमदपूर व जळकोट तालुक्यातही वाऱ्यामुळे आंब्याचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Lack of Horticulture due to incessant rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.