कुंभमेळ्याचा मेळ बसेना!
By Admin | Updated: August 31, 2015 13:46 IST2015-08-31T13:37:25+5:302015-08-31T13:46:40+5:30
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होत असलेल्या कुंभमेळ्यासाठी जाणार्या भाविकांसाठी जालना विभागाने ५0 विशेष बसेसची व्यवस्था केली होती.

कुंभमेळ्याचा मेळ बसेना!
जालना : नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होत असलेल्या कुंभमेळ्यासाठी जाणार्या भाविकांसाठी जालना विभागाने ५0 विशेष बसेसची व्यवस्था केली होती. मात्र प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे हे नियोजन कोलमडले आहे. प्रत्येक आगारातून दोन ते तीनच बसेस नाशिक येथे गेल्याचे समोर आले आहे.
नाशिक येथे होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जालना जिल्ह्यातील भाविकांसाठी एसटी महामंडळाने ५0 विशेष गाड्यांचे नियोजन केले होते. जालना, अंबड, परतूर व जाफराबाद आगारातून प्रत्येक दहा बस गाड्या सोडण्यात येणार होत्या. मात्र प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे एसटी महामंडळाच्या अपेक्षित आर्थिक नियोजनावरही चांगलाच परिणाम झाला आहे. बारा वर्षातून एकादा होणार्या नाशिक कुंभमेळा लक्षात घेऊन एसटीने ५0 गाड्या राखीव ठेवल्या होत्या. असे असले तरी प्रत्येक आगारातून अत्यल्प प्रवासी नाशिकसाठी रवाना झाले. जालना आगाराच्या २, अंबड ४, परतूर ४ बसेस रवाना झाल्या होत्या. विशेष म्हणजे काही बसगाड्या औरंगाबाद पर्यंत रिकाम्याच आल्याचे सांगण्यात येते.
मोठा उत्सव लक्षात घेता एसटी महामंडळाने गाड्यांची व्यवस्था केलेली आहे. या गाड्यांसोबतच जालना, अंबड येथून नाशिकसाठी नियमित गाड्या आहेत. विशेष गाड्यांना प्रवाशांनी पसंदी न दिल्याचे शनिवार व रविवारचे चित्र होते.
खासगी वाहनांकडे कल बहुतांश नागरिक खाजगी वाहने करुन प्रवास करत असल्याने एसटी महामंडळाच्या गर्दीवर परिणाम होत आहे. नाशिक येथे जिल्ह्यातून हजारो भाविक गेले असले तरी अनेकांनी खाजगी वाहन अथवा रेल्वेने जाणे पसंत केल्याने बसेसमध्ये तुलनेने गर्दी कमी दिसून आली. ■ कुंभमेळा व रक्षाबंधन एकाच दिवशी आल्याने गर्दीवर परिणाम झाल्याचे जालना आगार प्रमुख एस.जी. मेहेत्रे यांनी सांगितले. नाशिकपेक्षा विदर्भात जाणार्या प्रवाशांचे प्रमाण जास्त होते. इतर विभागातून नाशिक येथे मोठय़ा प्रमाणात बसेस आल्याने प्रवाशांवर परिणाम झाला. रक्षाबंधनामुळे शनिवारसोबतच रविवारीही प्रवासी भारमान होते. |
(प्रतिनिधी)