‘कृषी’चे तक्रार निवारण केंद्र
By Admin | Updated: May 25, 2014 01:05 IST2014-05-25T00:43:47+5:302014-05-25T01:05:56+5:30
उस्मानाबाद : तक्रारी शेतकर्यांना सहजरित्या नोंदविता याव्यात यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जिल्हा व तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष सुरू केले आहेत

‘कृषी’चे तक्रार निवारण केंद्र
उस्मानाबाद : विविध प्रकारचे बियाणे, खत छापील किंमतीनुसार मिळते की नाही; अथवा अन्य बाबतीत असलेल्या तक्रारी शेतकर्यांना सहजरित्या नोंदविता याव्यात यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जिल्हा व तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष सुरू केले आहेत. त्यामुळे शेतकर्यांसाठी तक्रार नोंदविणे सोपे झाले आहे. सध्या जिल्हाभरातील शेतकर्यांची खरीप पेरणीच्या अनुषंगाने लगबग सुरू झाली आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहे. खत, बी-बियाण्याची ऐन पेरणीच्या काळात निर्माण होणारी टंचाई लक्षात घेवून शेतकरी आतापासून बियाणे, खताची जमवाजमव करू लागले आहेत. अशावेळी शेतकर्यांना भेडसावणार्या अडचणी तातडीने सोडविल्या जाव्यात, त्यांच्या तक्रारीचे निराकरण व्हावे, यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर विशेष कक्ष सुरू करण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी कार्यालय आणि तालुकास्तरावर गटविकास अधिकारी कार्यालयात या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सदरील कक्ष सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मदनलाल मिणीयार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दरम्यान, सदरील सुविधेप्रमाणेच शेतकर्यांना त्यांच्या तक्रारी कृषी विभागाच्या १८००२३३४००० या टोल फ्री क्रमांकावरही नोंदविता येणार आहेत, असेही मिणीयार यांनी नमूद केले आहे. (प्रतिनिधी) पेरणीपूर्वी बियाणे पारखून घ्यावे यंदा सोयाबीनच्या बियाणची कमतरता आहे. त्यामुळे शेतकर्यांनी विशिष्ट कंपनीच्या बियाण्याचा आग्रह न धरता घरगुती बियाण्याची उगवणक्षमता तपासून पेरणीसाठी वापरावे. मात्र, पेरणीपूर्वी बियाण्यावर बीजप्रक्रिया करून घ्यावी. तसेच विविध कंपन्याचे बियाणे खरेदी करताना खात्री करूनच घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी मदनलाल मिणीयार यांनी केले आहे. तक्रार निवारण कक्षातील संपर्क क्रमांक कृषी विकास अधिकारी (जिल्हा परिषद) ०२४७२-२२३७९४, गटविकास अधिकारी (उस्मानाबाद) ०२४७२-२२२१५७, गटविकास अधिकारी (उमरगा) ०२४७५-२५२०२७, गटविकास अधिकारी (लोहारा) ०२४७५-२६६५७९, गटविकास अधिकारी (तुळजापूर) ०२४७१-२४२०४०, गटविकास अधिकारी (परंडा) ०२४७७-२३२०२८, गटविकास अधिकारी (वाशी) ०२४७८-२७६९०० आणि गटविकास अधिकारी (कळंब) ०२४७२-२६२२२५ या क्रमांकावर शेतकर्यांना त्यांच्या शंका, अडीअडचणी आणि तक्रारी नोंदविता येणार आहेत.