तुटपुंज्या कमाईसाठी राबताहेत कोवळे हात

By Admin | Updated: June 15, 2014 00:57 IST2014-06-15T00:11:40+5:302014-06-15T00:57:24+5:30

हरी मोकाशे , लातूर विविध खेळांत रमायचे, मौज- मजा करायची त्याचबरोबर शिक्षणाचे धडे गिरवायचे असे वय

Kowale hand for heavy earnings | तुटपुंज्या कमाईसाठी राबताहेत कोवळे हात

तुटपुंज्या कमाईसाठी राबताहेत कोवळे हात

हरी मोकाशे , लातूर
विविध खेळांत रमायचे, मौज- मजा करायची त्याचबरोबर शिक्षणाचे धडे गिरवायचे असे वय असलेल्या बालकांचे कोवळे हात मात्र शहरातील अनेक हॉटेलमध्ये कपबशी उचलणे, टेबल स्वच्छ करणे, विटा उचलणे तसेच मोटार गॅरेजमध्ये वाहनांचे नट फीट करण्यासाठी राबताहेत़ अनेक बालकांचे वाहनांचे नट फीट करण्यातच आयुष्याचे बालपण फिरून हरवत आहे़ बालकांकडून काम करुन घेणे हा जरी शासन दरबारी गुन्हा असला तरी हा गुन्हा करण्याचे धाडस बिनधास्तपणे केले जात आहे़ ज्यांच्यावर बालकामगार मुक्त करण्याची जबाबदारी आहे ती यंत्रणा मात्र सुस्तच असल्याचे पहावयास मिळत आहे़
शहरातील विविध हॉटेल, ढाबे, वीटभट्टी, मोटार गॅरेज यांना शुक्रवारी अचानक भेटी देऊन पाहणी केली असता दहा हॉटेलच्या पाठीमागे चार हॉटेलमध्ये बालकांचे हात राबत असल्याचे पहावयास मिळाले़ त्याचबरोबर शहरातील जवळपास ३० टक्के ढाब्यांवर बालके विविध कामे करीत असल्याचे दिसून आले़ प्रत्येक वीटभट्टी आणि मोटार गॅरेजमध्ये तर किमान एक- दोन बालमजूर उन्हात पोटासाठी राबत असल्याचे दिसून आले़
वास्तविक पहाता ८ ते १४ वयोगटातील बालकांना कामावर ठेवणे गुन्हा परंतु, त्याचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे़
विटभट्टीवर बालकामगार...
८ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांना कामावर ठेवता येत नाही़ त्यांना कामावर ठेवले तर बालकामगार (प्रतिबंध व नियमन) अभिनियम १९८६ नुसार गुन्हा आहे़ या कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊन तो सिध्द झाल्यास १० ते २० हजार रुपयांपर्यंत दंड आणि ३ ते १ वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते़
दोन वर्षांत तीन तक्रारी़़़
बालकामगार प्रतिबंधक व निर्मूलन अधिनियम १९८६ नुसार सर्वसामान्य व्यक्तीही तक्रार करु शकतो़ बालकामगारांना मुक्त करण्याचा सर्वांना अधिकार आहे़ या तक्रारीनंतर धाड टाकून बालकामगारांना मुक्त केले जाते़ दोन वर्षांत तीनच तक्रारी कार्यालयात दाखल आहेत.
३०- ४० रुपयांत दिवसभर कष्ट़़़
बालकांच्या गरिबीचा, अडचणींचा फायदा घेऊन शहरातील काही भागांत बालकांना काम लावले जात आहे़ दिवसभर काम केल्यानंतर अवघे ३० ते ४० रुपये बालकांच्या हातावर ठेवले जातात़ विशेष म्हणजे, शहराच्या मुख्य ठिकाणी बालकामगारांकडून काम करुन घेतले जात आहे़ लातूर शहरातील बहुतांश खानावळींमध्ये बालकामगार राबतात.
चाईल्ड लाईनचे सहकार्य़़़
बालकामगारांची मुक्तता करण्यासाठी चाईल्ड लाईनही कार्यरत आहे़ या स्वयंसेवी संस्थेने गेल्या वर्षभराच्या कालावधीत २१ बालकामगारांची मुक्तता केली आहे़ यात लातूर रेल्वे स्टेशनवरुन ३, लातूर शहरातून १२, चाकुरातून २ आणि चापोलीतून ४ अशी संख्या आहे़ वास्तविक पहाता बालकामगार कृती दलापेक्षा या स्वयंसेवी संस्थेचे कार्य जास्त प्रभावी असल्याचे दिसून येत आहे़ शासन नियुक्त कृती दल केवळ कागदोपत्रीच आहे.
बालकांच्या अडचणींचा फायदा घेऊन त्यांना न पेलतील अशी कामे करुन घेतली जातात़ गरिबीमुळे कमी वयात कष्ट उपसावे लागतात़ त्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहतात़ शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच त्यांच्या पोटाचा प्रश्न सुटावा म्हणून शासनाने शिष्यवृत्तीची सोय केली असून मुक्त करण्यात आलेल्या बालकांना वसतिगृहात ठेवले जाते, असे सहायक बालकामगार अधिकारी पवनकुमार चव्हाण यांनी सांगितले़
दोन वर्षांत १५ जणांची मुक्तता़़़
बालकामगार कृती दलाने गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात धाडी टाकून केवळ १५ बालकामगारांची मुक्तता केली आहे़ सन २०१२-१३ मध्ये औशातून २, निलंगा, उदगीर येथून प्रत्येकी ३, अहमदपुरातून २ आणि उदगीर येथून एका बालकागाराची मुक्तता करण्यात आली आहे़ ही संख्या ११ अशी आहे़ सन २०१३-१४ मध्ये केवळ चार बालकांची मुक्तता करण्यात आली असून ही चारही बालके लातुरात काम करीत होती़
मुक्ततेसाठी बालकामगार कृतीदल़़़
बालकामगारांची मुक्तता करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बालकामगार कृतीदल समिती आहे़ या समितीचे सदस्य सचिव सहायक कामगार अधिकारी असून यात पोलीस अधीक्षक, महिला व बालविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, समाजकल्याण अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे़
प्रशासकीय समितीचे दुर्लक्ष...
बालकामगारांची मुक्तता करण्यासाठी शासनाने नियुक्त केलेली समिती नुसतीच कागदोपत्री आहे. कधी संशयित आस्थापनांची साधी चौकशीही केली जात नाही. परिणामी, बालकामगारांचे कमी पैशांत शोषण केले जाते.

Web Title: Kowale hand for heavy earnings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.