‘गुडघ्या’चे बाशिंग झाले सैल
By Admin | Updated: July 7, 2015 00:54 IST2015-07-07T00:25:03+5:302015-07-07T00:54:17+5:30
औरंगाबाद : निवडणुकीसाठी वर्षभरापासून सातारा- देवळाईत तयारीला असलेल्या ‘भावी’ उमेदवारांचा उत्साह ओसरत गेला अन् आता तर घिरट्या घालणारी चाके जैसे थे अवस्थेत रुतली

‘गुडघ्या’चे बाशिंग झाले सैल
औरंगाबाद : निवडणुकीसाठी वर्षभरापासून सातारा- देवळाईत तयारीला असलेल्या ‘भावी’ उमेदवारांचा उत्साह ओसरत गेला अन् आता तर घिरट्या घालणारी चाके जैसे थे अवस्थेत रुतली. ग्रामपंचायतीमधून, नगर परिषद आणि महानगरपालिकेत समावेश असे रहाटगाडगे नागरिकांनी पाहिले. २५ वॉर्डातून फक्त दोनच वॉर्ड अस्तित्वात आले. अर्धा लाख मतदार दोन भागांत विखुरले गेले. वॉर्ड आरक्षणात खुला आणि एसटी महिला वॉर्ड सुटल्याने अनेकांनी ‘गुडघ्याला बांधून ठेवलेले बाशिंग’च सैल झाल्याचे कबूल करीत आपापल्या कामावर जाणे पसंत केले आहे.
पावसाने जोराची सुरुवात केल्याने बोअरची काहीअंशी पाणी पातळी वाढली. मनपाचे २१ टँकर आजही सुरू असल्याने मग उगाच कशाला व्यर्थ श्रम वाया घालवायचे म्हणून नशिबाला दोष देत कार्यकर्ते सध्या तरी ‘भूमिगत’ झाल्याचे दिसत आहे. अहो काय चाललंय? कोण उमेदवार तयारीत आहे? असे प्रश्न एकमेकांना विचारले जात आहेत. परंतु प्रत्येक जण त्या चर्चेतच ‘रस’नसल्याचा आव आणून मला घरचे अर्जंट काम आहे, मी जाऊन येतो, असा बहाणा करीत निघून जाताना दिसत आहे. सातारा वॉर्ड एस.टी. महिलेसाठी राखीव झाल्याने आता उमेदवार कोण असा सवाल प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे. स्थानिक उमेदवार शोधावर सर्वच पक्षांनी भर दिल्याचे दिसत आहे. आम्ही एक- दोघे पाहून ठेवले आहेत. परंतु पक्ष कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार; याची आम्हाला कल्पना नाही, असे सांगून कार्यकर्ते वेळ मारून नेत आहेत.
खुल्या वॉर्डाकडे अनेकांच्या नजरा वळल्या असल्या तरी आपला ‘शिक्का’ त्या वॉर्डात चालेल का? शेवटी पक्षाची मर्जी राखणारा कोण? तेथे आपला काय निभाव लागणार आहे ? असे अनेक प्रश्न इच्छुकांसमोर आहेत. या भागात अतिक्रमण पाडापाडी हा कळीचा मुद्दा आहे.
४धनिकांची चालणार की जनतेच्या कामात श्रम ओतणारा या विषयीही जनता विचार करीत आहे. परंतु अनेक जण मनपा की नगर परिषद अशा आशेवर ‘छापा -काटा’ करीत आहेत. कारण याविषयीची याचिका न्यायप्रविष्ट आहे. त्याबाबत सर्वच पक्षांनी मौन धरले आहे. बहुतांश जनता म्हणते की, कोणीही असो; रस्ते,पाणी, वीज, ड्रेनेज हे प्रश्न सोडवा, पण पुन्हा हातोडा नको.